Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 23 July, 2008

अरे पावसा पावसा, तु आहेस तरी कुठं !!!

       आभाळ भरुन येतंय, पण पावसाच पत्ताच नाही. १९३६, १९७२, आणि आता २००८ म्हणजे बरोबर छत्त्तीस वर्षानंतर आता पाऊस पडणारच नाही, भयंकर दुष्काळ पडणार आहे, अशी भविष्यवाणी आमच्या एका दोस्ताने केली. आणि पुन्हा आम्ही कवितेच्या पुस्तकात घुसलो. कविता वाचता…वाचता…….कवितेच्या शब्दा-शब्दावरुन. लिंकवर क्लिक केल्यावर जसे इतर दूवे उघडतात तसे मनाचे अनेक दुवे उघडत गेले ….दररोज, कडाक्याचे ऊन पडत असल्याने पावसाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. केवळ शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूसही पावसाने डोळे वटारल्याने हवालदिल झाला आहे. आषाढीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारकरी एकदा परतला की तो पाऊस घेऊन येतो असा एक समज आहे. बाजरी, मका, मुग, कापूस, तूर, यांची पेरणी झालेली असली की दोन पानांची रोपं पांडुरंगासारखी कर कटेवर ठेवून डोलत असतात. पण यंदा वारक-याला दर्शन करुन आला तरी त्याची नजर आभाळाकडेच. शेतक-याने खरिपाच्या पिकाची आशा सोडली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणुन तरी पाऊस यावा इतकीच अपेक्षा उरली आहे. खरे तर य काळात रानं हिरवीगार झालेली असतात. डोंगरद-यातून खळखळत वाहणारे पाणी, गावा-गावातील अध्यात्मिक वातावरण आणि येणा-या सनासुदींमुळे वातावरण भारलेले असते. आणि आम्हाला पावसाच्या कवितेची आठवण होते, बहिणाबाई म्हणतात…

 

 

                           आला पह्यला पाऊस
                                शिपडली भुई सारी
                           धरत्रीची परमय
                                माझं मन गेलं भरी 

                           आला पाऊस पाऊस
                                आता सरीवर सरी
                            शेतं शिवारं भिजले
                                नदी नाले गेले भरी….!!!

बहिणाबाईच्या कवितेतला पाऊस असा भरपूर कोसळणारा. धरित्रीचं मन ओला करणारा असा पाऊस, शिवार गच्च करणारा पाऊस, नदी नाले तुडूंब भरणारा पाऊस. पण यंदा काही त्याचे लक्षणे नीट दिसत नाही. जमीन आणि आकाशाची भेट म्हणजे जीवा-शिवाची भेट. दोघांच्या भेटीने दरवळणा-या मृदगंधाने प्रत्येकाच्या आनंदाला उधान येतं. मात्र दुष्काळामुळे भूईचेच दु:ख पेटले आहे. ते कोणीतरी विझवायला पाहिजे अशी हाक कवितेतून येत आहे. एक अज्ञात कवी म्हणतो.

ढग पांगले पांगले, हाक पावसाला द्या रे
दु:ख पेटले भुईचे, कुणी विझवाया या रे

           

          ढगांचा पांगण्यामुळे धरित्रीचे दु:ख पेटले आहे, आणि ते दुखः केवळ पावसानेच विझणार  आहे. पावासाच्या शोधात असलेला शेतक-याला वेड लागण्याची वेळ आली आहे. बेभानपणे पडणारा पाऊस दूर कुठेतरी गेलेला आहे. आणि त्याची परिणीती दु;खात होते. दिवसभर लागणारी झड, दिवस-दिवस चालत असायची, ‘आता थांब रे बाबा, अशी विनवणी करण्याची वेळ आणणारा पाऊस हरवला आहे. डोहांच्या काठावर नाचणारा मोर, मना-मनातून वाहणारे पावसाचे झरे, झाडांनी अलगद टिपून घेतलेले पावसाचे थेंब, मोहरुन लाजणारे वृक्ष, काळेभोर झालेले आकाश….हे सारं स्वप्नवत वाटत आहे. सरकारने दिलेल्या पॅकेजचे पैसे, खतासाठी, बियाणांसाठी, दिले याचा विसर होऊन शेतकरी अवांतर खर्च करतोय, नवी कोरी टू-व्हीलर, घेऊन मोबाईलवर हॅलो, हॅलो, करतोय. आणि न पुरणारे पैसे संपल्यावर पुन्हा तेच दु:ख. पाण्याच्या शोधात किडे-किरकुडे शहराकडे येताहेत, रानात चारा नसल्यामुळे जणावरांचे हाल पाहवत नाही. भविष्याच्या चिंतेने मुक्या धनाला बाजाराच्या दावणीला बांधले जात आहेत.
ना.धो. महानोर म्हणतात-

पांगलेला पावसाळा, वाट भरलेली धुळीने
मोडक्या फांदीस घरटे, वाळलेली शुष्क पाने.
दूर गेल्या पायवाटा डोंगराच्या पायथ्याशी
पंख मिटल्या झोपड्यांचे दु:ख कवटाळे उराशी.

     

 पांगलेल्या पावसाने मोडकी फांदी, वाळली पाने, दूर गेलेल्या पायवाटा आणि दु़ख; पुजलेलेच. जिथे पाण्यासाठी उन्हाला व्याकूळ होण्याची वेळ आली तिथे जीवाचे काय हाल. पावसाअभावी जीव भीतीने कासावीस झाल्याशिवाय राहत नाही.
पाऊस आलाच नाही तर…….पक्षांचे थवे मरणाचा निरोप देत इतरत्र जातील. घरातील कर्ता माणूस कुठे निघून जाईल त्याची भीती कुटूंबाला लागून राहीली आहे. आणि असा विचार करता करता माय माऊलीच्या डोळ्यांचा कडा ओलावतात. पक्षी नुसते हिरमुसले होऊन वाळलेल्या पानांकडे पाहत आहेत.सुस्तावलेल्या झाडाला ओल नाही. आणि शेतक-याच्या दुखःला कुठेच तळ नाही. पावसाचा गार झोंबणारा असा गारवा नाही. कुठे बगळ्यांचा थवा शेतात नाही. आणि पुन्हा पहिल्या पावसाची आठवण होते. मंगेश पाडगावकर म्हणतात….

पहिला पाऊस येतो आधी
आजीच्या पाठीवरच्या घामोळ्यांवर
बाजूला मी उभा भिजत,
     माझा मलमलाचा इवलासा सदरा ओलाचिंब. 
         
               झाडाच्या हिरव्या गाई तहानलेल्या            
                 पहिल्या पावसात पानांनी शहारत             
      उचलतात डो़ई वर, झेलतात सरी.

         

         आपल्यालाही आठवत जातात पहिल्या पावसात ओलेचिंब झालेले आपण. घरात झटकून धुळ झटकावून काढलेल्या छत्र्या, रेनकोट, आणि आपल्याला आठवतात गोणपाटाचा केलेला रेनकोट. पोत्याचा कोपरा मुडपून भिजत चाललेले आजोबा. चिंब झालेले रान. यातले आता काहीच नसते. सा-या वाटा, वळणं मागे टाकून आयुष्य असं कधी उजाड माळरानावर येऊन विचार करायला लावते. पाणी ग्लासात ओतून प्यायला द्यावे, तसे रोपट्यांना ग्लासाने पाणी ओतणा-या स्त्रीयांना पाहिलं की आमच्या -दयात कालवाकालव होते. तेव्हा सोबतीला केवळ भन्नाट वारा असतो. पाण्यासाठी हरवलेल्या दाही दिशा, आणि डोळ्यात पूर, तेव्हा काय करावे काहीच समजत नाही. पावसळ्यात मस्त भटकंती करुन यावे असा विचार पक्का झालेला असतो…..पावसाळी दिवसात कुठे तरी घाटात भटकून यावे, प्रवास व्हावा, सुरेल पावसाच्या धारेत आपला सुर मिसळून आपल्याच गाण्यावर खू्श व्हावे. आणि पुन्हा एकदा बालकवीची कविता वाचायला हवी असा विचार तरळून जातो. विंदा म्हणतात….

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

          

       असाही एक विचार मनात डोकावतोच….तक्रार करावी तर कोणाकडे करावी. दरवळणारा मातीचा सुवास येत नाही. माणसाला माणूसपण देणार्‍या मातीला भेगा पडल्या आहेत. पाण्याअभावी ढेकळं अजून विरघळली नाहीत. शेती जीवनाला आकार देणारा पाऊस पडावा यासाठी परमेश्वराची आठवण होत आहे. सर्व भेदाभेद दूर होऊन. धोंडी-धोंडी पाणी दे असा आवाज गावात घुमतोय. निसर्ग हाच देव त्याच्या भेटीची ओढ तीव्र होत आहे, बहिणाबाई म्हणताहेत……..
         

                      येता पाऊस पाऊस
                             पावसाची लागे झडी
                      आता खा रे वडे भजे
                           घरांमधी बसा दडी  
                    देवा, पाऊस पाऊस
                             तुझ्या डोयातले आंस
                     दैवा, तुझा रे हारास
                            जीवा, तुझी रे मिरास.      

 

        आता भरपूर पाऊस होऊ दे !!! अजून दोन महिने शिल्लक आहेत. चांगला गडगडात होऊ दे, जोरदार पावसाच्या वर्षावात भरपूर पावसाची गाणी येऊ दे, पावसाबरोबर रेंगाळणा-या आठवणी येऊ दे. तिच्या आठवणी चिंब होउन लगडत आहेत. काळ्याभोर ढगांच्या प्रवासात माझाही निरोप तिच्यापर्यंत जाऊ दे……मस्त पैकी कांदे भजे, वडे, वाफाळलेला चहा, असा बेत होऊ दे, आणि पावसाच्या गदारोळात तिच्या डोळ्यातील पावसाला मात्र थांबू दे. तरीही राहून राहून ना. धो. महानोरांच्या कवितेची आठवण होतेच.

आभाळ भरुन येते पुष्कळ
पहिल्यासारखी बरसात नाही.
नक्षत्रामागून नक्षत्र सरतात
तरीही मृदगंध दरवळत नाही.
गावाकडला गलबला पुसट
ऐकायला येतो डोंगराकडून
अंधार्‍या रात्री प्राण कासावीस होतो.
जुन्या आठवणी स्मरून.

        

        पुर्वीसारखा पाऊस पडत नाही, ही अनेकांची त्रक्रार असते. कधी मुसळधार पावसानं गावच्या गावं पाण्याखाली जातात, तर कधी पावसाचा टीपूस नाही. जीव मेटाकुटीला आणणा-या निसर्गाच्या लहरीपुढे माणूस हतबल झाला आहे. रोहिण्या बरसल्या की मृगाच्या सरी बरसतात. त्यावर एकदा पेरण्या झाल्या की शेतक-याच्या चेह-यावरील आनंद लपत नाही. पण यंदा रोहिण्या बरसल्या नाही. मृगानं दगा दिला. आर्द्रा कोरडाच आहे. जीथं थेंबा-थेंबी झाली तिथं केलेल्या पेरण्या वाया गेल्या.

गुज बोले गुज बोले
गुज मिरोग बोलला
तेलपाणी लावा काव
आता तिफन उचला

          

      इंद्रजीत भालेरावांची पावसापुर्वीची कविता. तिफण उचलली, पेरणी झाली, वाफधावन झाली, पावसाच्या सुकाळात गवत, धान, तरारुन आलेलं आहे. मग पाखरं राखायचेत, चोर राखायचेत, शाळेतला ‘सुगीचे दिवस’ नावाचा धडा आठवायचा. सुगीची कामं दिवस रात्र करुन उरकायची, मळणी, उधळणी, खळं मागायचं, आणि सर्वा उचलत उचलत पुढल्या वर्षीचा हिशोब डोळ्यासमोरुन सरकत जाईल………पुन्हा पावसाच्या वाटेकडे डोळे लावायचे.

 

 

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 8 July, 2008

माझी कविता

प्रयत्नही करुनही जमत नाही कविता
तेव्हा होणारा वैचारिक मनस्ताप
माझ्या अहंकाराला डिवचतो.
ही अस्वस्थता कोसळत जाते,
तिन्ही सांजेला. .

धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन
कवितेला बिलगुन चालतांना
कोणताच विचार मला सुचत नाही.
ऐनिलिसिस करता येत नाही
गुदमरलेल्या श्वासांचा.

आभाळ भरुन आल्यावर
मी डोकावून पाहतो,
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 6 June, 2008

बीबी का मकबरा

नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.!!!

बीवी का मकबरा

या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे.  आगर्‍याचा ताजमहाल संगमरवरी दगडाचा बनलेला आहे. तर मकबरा हा पांढर्‍या मातीपासुन (प्लास्टर)  बनविलेला आहे. एका भव्य दरवाजातून प्रवेश केल्यावर प्रवेशदारात मोठा पाण्याचा हौद आहे. त्यात डोलणारी कमळांची फुले लक्ष वेधुन घेतात. त्यानंतर पुढे कारंजे आणि दोन्ही बाजूने दगडी रस्ता आहे. दोन्ही बाजुने सरुची वृक्ष लावलेली आहेत. बीबीच्या मकबर्‍याची भव्यता आणि सौंदर्य डोळ्यात साठवण्याच मोह व्हावा. मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला आहे. मकबर्‍यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. पुर्वी थेट तिथे जाता येत होते आता तो भाग प्रवेशासाठी बंद केला आहे. कबरीच्या चारही बाजुने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. कबरीची रचना करतांना वरील छतांच्या खिडक्यांची  अशी रचना केलेली आहे की त्या कबरीवर दिवसा सुर्याची किरणे आणि रात्री चंद्राचा प्रकाश त्या कबरीवर पडतो. मकबर्‍याचा घुमट संगमरवरी दगडाचा बनलेला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजुने दोन ताळी मिनार बांधलेले आहेत. कधी काळी मिनारावर जाता येत होते. पण लोकांनी इहलोकाची यात्रा संपवण्यासाठी या जागेची निवड केल्यामुळे हा रस्ता कायमचा बंद करण्यात आलेला आहे.

29042008042

औरंगजेब व त्याची बेगम यांच्या वापरात येणार्‍या काही वस्तु भांडे, फर्निचर,वस्त्र, लाकडी फर्निचर,  या संग्रहात ठेवले आहे. पण हे संग्राहलय सुद्धा बंद करण्यात आलेले आहे.

29042008032 29042008035 29042008037

आजुबाजुच्या वीट भट्ट्यांमुळे संगमरवरी वास्तु काळी पडत  आहे. त्याला रंगकाम देण्याचे काम सतत चालले असते.

मकाइ दरवाजा

औरंगाबाद शहरात किमान सोळा किंवा अधिक दरवाजे अजुनही येणार्‍या जाणार्‍याचे स्वागत करुन  गतकाळाची आठवण देत असतात.

29042008018

पुरातत्व खात्याने जर इमारतींची काळजी घेतली नाही तर आजुबाजुच्या वीटभट्ट्यामुळे ही सुंदर शिल्प काळाचे पडद्याआड जातील असे मात्र राहुन राहुन वाटते.

 

 

 

 

 

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 18 May, 2008

मराठी भाषा : इतिहास आणि विकास

     कोणती भाषा केव्हा जन्माला आली हे सांगणे अवघड असते. भाषा एखाद्या कोणत्या क्षणी झाली आणि कोणत्या क्षणी नष्ट झाली असे म्हणता येत नाही. भाषा ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. एका भाषेचा शेवट दुसर्‍या भाषेची सुरुवात नसते. म्हणून मराठी भाषा इथून सुरुवात झाली असे म्हणता येत नाही.

भाषेचा कालखंड या प्रमाणे आहेत.

वेदपुर्वकालीन भाषा - इ. स. पू. ५००० च्या पूर्वी
वैदिक, ब्राह्मण, सौत्र उपनिषदे -इ. स.पू. ५००० ते इ. स.पू. १०००
पाणिनीय संस्कृत- -इ.स.पू. १००० ते इ. स. पू.२००
पाली -इ.स.पू. ६०० ते इ. स. पू. २००
महाराष्ट्री, मागधी, शौरसेनी, पैशाची -इ. स. पू. २०० ते इ.स. २००
अपभ्रंश -इ.स.पू. ४०० ते इ.स. ७००
मराठी, गुजराथी, हिंदी, इत्यादी -इ.स. ७०० च्या दरम्यान

    मराठी भाषा आर्य भाषाकुळात उत्पन्न झाली असे समजल्या जाते. वेदपुर्वकालीन भाषेची  कल्पना वेदसमकालीन वाङ्मयावरुन ठरवावे लागेल. येथील मूळ लोकांची भाषा कोणती होती हेही सांगणे जरा अवघडच आहे. आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्या भाषेचे नाव काय होते या बद्दल मतभेद आहेत, इंडो-युरोपियन, इंडो-जर्मन, इंडो क्लासिक, आर्यन, इत्यादी इत्यादी. तरीही आर्यांची भाषा आर्यन हे जरा बरोबर वाटते. वेदभाषेत देव, शाल,अग्नी, पशू, पितृ, नृ, रै, गौ इत्यादी शब्द वेदपूर्व भाषेत हेच शब्द देवह, शालाह, अग्नय,पशव,पितर, नर-नार, रय-राय,गव-गाव असे आहेत. प्राकृत भाषा ही प्राचीन भाषा आहे. अतिप्राचीन काळात ती आर्याची एक बोली भाषा असावी. सुशिक्षित वर्गाची भाषा वैदिक तर सर्वसामान्याची भाषा प्राकृत असावे. वैदिक भाषेत अनेक प्राकृत शब्दात आढळतात. जसे, वक= वक्र, वहू=वधू, मेह=मेघ, पुराण= पुरातन, चन्दिर=चंद्र , इंदर= इंद्र,मरन्द= मकरंद. त्यानंतर पाणिनीय संस्कृत भाषेची अवस्था येते. महाकवी व्यास, वाल्मिक यासारख्या कवींनी या भाषेला प्रगल्भता आणली. कालिदास, भवभूती, दण्डी, बाण, शंकररामानुज, इत्यादी लेखकांनी ही भाषा समृद्ध केली. वैदिक संस्कृत ही पाणिनीय संस्कृतपेक्षा इराणमधील ‘अवेस्ता’ भाषेशी अधिक जवळची वाटते. इंडो-इराणियन भाषा गटात वैदिक संस्कृत आणि इराणमधील अवेस्ता या भाषांचा समावेश होतो.

    पुढे प्राकृत भाषेपासून मराठी उत्पन्न झाल्याच्या खुणा या प्राकृत भाषेत दिसत असल्या तरी प्राकृत भाषा ही एकच होती असे समजण्याचे काही कारण नाही.ती सामान्य लोकांची बोलीभाषा असावी. ती बोली ज्या ज्या प्रदेशात बोलल्या जात असावी त्या प्रदेशावरुन त्या त्या भाषेला ती नावे मिळाली असावी. महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी, पैशाची, अवन्तिका, प्राच्या, इत्यादी प्राकृत भाषा महत्त्वाच्या मानल्या जातात. समाजात वावरणारे वेग-वेगळे घटक वेगवेगळी प्राकृत भाषा बोलत असत असे नाट्यशास्त्रात सांगितले आहे म्हणतात. पद्याची भाषा महाराष्ट्री, शौरसेनीभाषा राजस्रिया व दुती बोलत, दरबारात काम करणार्‍या स्रिया या मागधी बोलत. कोळसे विकणारे पैशाची, सैनिक,राजपुत्र व्यापारी अर्धमागधी बोलत. विदुषक आणि इतर पात्र प्राच्य भाषा, तर मोळी विकणारे शाबरी अशी वेगवेळी भाषा समाजातील विविध घटक बोलत असत.

प्राकृत भाषेचे प्रमुख प्रकार असे

१) वेदकालीन प्राकृत- प्राथमिक अवस्था.
२) मध्ययुगीन प्राकृत - पाली, महाराष्ट्री शौरसेनी इत्यादी
३)महाराष्ट्री- शौरसेनी सारख्या भाषांची अपभ्रंश भाषा
४)हिंदुस्थानातील सध्याच्या रुढबोली.

     वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात मात्र त्यांच्यात एकमत अजूनही दिसून येत नाही.

मराठी भाषेच्या बाबतीत काही मते अशी-

१) वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. आणि इतर प्राकृत भाषेच्या रुपाशी जुळणारे विशेष सापडतात. पण एवढ्यावरुन अभ्यासक तिला प्राकृत पासून निर्माण झाली असे मानण्यास तयार नाहीत. वेदकाळापासून इ.स. ५०० - ७०० पर्यंत वेदकालीन प्राकृत भाषा समाजात वापरात नव्हत्या त्यामुळे हे मत योग्य वाटत नाही.

२) संस्कृत पासून मराठी भाषा निर्माण झाली असे एक मत आहे. संस्कृतपासून मराठी निर्माण झाली नाही कारण वर्णांने बदल, प्रयोगातील वेगळेपणा, उच्चारणातील फरक, वाक्प्रचार, इत्यादी बाबतीत दोन्हीही भाषेत खूप वेगळेपणा आहे. जे थोडेफार साम्य आहे ते पुरेसे नाही.

३) प्राकृतापासून मराठी भाषा निर्माण झाली असे मत आहे. पण कोणत्या प्राकृत भाषेपासून याचेही नेमकेपणाने उत्तर मिळत नाही. संस्कृत,प्राकृत, अपभ्रंश या भाषेचे थोडे थोडे गूण दिसतात. पण याच प्राकृत पासून मराठी जन्माला आली असे म्हणता येत नाही. प्राकृत भाषेपासून आधुनिक बोली तयार झाल्या आहेत जश्या शौरसेनीपासून हिंदी, सिंधी. गुजराथी भाषा अपभ्रंशी पासून, तर बंगाली मागधी पासून. मराठी भाषेच्या बाबतीत असे म्हणता येत नाही. जेव्हा एखादी भाषा एखाद्या विशिष्ट भाषेपासून तयार झाली असे आपण म्हणतो तेव्हा तिचे मूळ भाषेच्या व्याकरणाचे सर्व रुपे स्वीकारलेली दाखविता आले पाहिजे. मराठीचे संदर्भात असे दिसते की, नामविभक्तीचा भाग मराठीने अपभ्रंश भाषेपासून तर आख्यात -विभक्ती क्रियापदाचे प्रत्यय वगैरे महाराष्ट्रीपासून घेतलेले दिसतात.

   मराठी भाषेत निरनिराळ्या प्राकृत भाषेच्या ज्या लकबी दिसतात त्यावरुन त्या प्राकृत भाषेपासून मराठी निर्माण झाली असे समजले जाते.

१) पाली या या प्राकृत भाषेतील काही गोष्टी मराठी भाषेत दिसतात.बर्‍याच शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली रुपे पाली भाषेत जशी आढळतात. तशी ती मराठी भाषेत दिसतात.

पाली : तृण, प्रावृष,पीडन,गूड
मराठी: तिण, पाऊस, पिळणे, गूळ

पाली भाषेतील ळ हा वर्ण पाली आणि पैशाची भाषेशिवाय दुस-या भाषेत नाही.
‘ळ’ हा वैदिक भाषेत आहे म्हणतात पण संस्कृत भाषेत नाही. ‘ळ’हा वर्ण द्रविडी भाषेतून मराठीत आला आहे.

२) पैशाची भाषा :

पैशाची भाषा: ऊन, तहान, कान, रान,
मराठी भाषा: उष्ण, तृष्णा,कर्ण,अरण्य
पैशाच्या भाषेतील वरील शब्द आजही मराठीत दिसतात. पैशाच्या आणि काही प्राकृत भाषेत ‘ण’ नाही

३) मागधी भाषा

मागधी भाषेच्या काही खुणा मराठी भाषेत आढळतात. मागधी भाषेत ‘र’ आणि ‘स’ या बद्दल ‘ल’ आणि ‘श’ वर्ण येतात. ‘ष्ट’ बद्दल ‘स्ट’ आणि ‘स्थ’ बद्दल ‘र्थ’ येतो. जसे, मिसळ =मिशळ /मिश्र, केसर = केशर.

प्राकृत अर्धमागधीचे बरेच विशेष मराठी भाषेत आढळतात. अर्थमागधीची रुपे माहाराष्ट्रीशीही जुळतात. दीर्घ स्वर र्‍हस्व करण्याची प्रवृत्ती मराठीने अर्थमागधी भाषेतून उचलली आहे. जसे, कुमर= कुमार

महाराष्ट्री भाषेची बरीच वैशिष्ट्ये मराठीत दिसतात, महाराष्ट्रीय आख्यात विभक्तीचे बरेच प्रकार ही महाराष्ट्री भाषेतून स्वीकारली आहे. जसे, हत्तीस= हत्तिस्स, आगीस = अग्गिस, करीन = करिस्सामो, करिशिल = करिस्सासि.

‘मी’ या सर्वनामाची सर्व रुपे महाराष्ट्रीच्या रुपाशी जुळतात. जसे अहस्मि = मी, आम्मि = मज, मए= मिया, म्या, मझतो = मजहुनि, मज्झ = मज. अनेकवचनी रुपे, अम्हे= आम्ही, अहमसुंतो = आम्हाहुनी, अहम= आम्हा.

अपभ्रंश भाषा :अपभ्रंश ही अभिरांची भाषा होती. आभीर जमात गुजरात, कोकण, विदर्भात स्थायिक झाली.
मराठी काव्यात असणारी अन्त्य ‘यमक पद्धती’ अपभ्रंश भाषेपासून मराठीने स्वीकारली आहे.

संस्कृत भाषेपासूनही मराठीने काही बाबी स्वीकारल्या आहेत.

१) ऋ, ई, औ, हे वर्ण संस्कृतमधे आणि मराठी भाषेतही आहेत. प्राकृत भाषेत हे वर्ण नाहीत.
२) ड; त्र ही अनुनासिके संस्कृतमधे आहेत. ते मराठीत आली.
३) अनेक संस्कृत शब्द मराठीने स्वीकारलेले आहेत. त्यात तत्सम आणि तद्भव शबांदाचा समावेश आहे.

मराठी ज्या प्राकृत भाषेपासून निर्माण झाली त्यासाठी एक दीर्घ कालखंड गेला असणार. पाली, शौरसेनी, महाराष्ट्री, वगैरे प्राकृत भाषा समाजात मान्यता पावल्या म्हणजेच त्या भाषेतून ग्रंथ निर्मितीही झालेली आहे. आधुनिक भाषा निर्माण झाल्यावर प्राकृत भाषेतून ग्रंथ निर्मिती होत होती इ.स. ११०० पर्यंत अनेक ग्रंथ निर्माण झाले असावेत. निरनिराळ्या प्राकृत भाषेपासूनच पुढे मराठी भाषेची निर्मिती झाली. शैरसेनी भाषा बोलणारा राष्ट्रीक समाज, मागधी व महाराष्ट्री बोलणारा वैराष्ट्रीक समाज आणि आभीर समाज महाराष्ट्रात आले त्यातूनच मराठी भाषा बोलल्या जाऊ लागली.

मराठी भाषेची उत्पत्ती पाहण्यासाठी काही शिलालेख, ताम्रपट आणि अन्य मराठी भाषेचा उल्लेख असणारी काही साधने यांच्या आधारे आपण मराठी भाषेचा निर्मिती काळ शोधण्याचा प्रयत्न करतो.
आणि अभ्यासकांना मराठीचा पहिला शिलालेख सापडला तो म्हणजे १) उनकेश्वराचा शिलालेख इस. १२८९ ला. आणि त्याहीपेक्षा मागे जातांना श्रवणबेळगोळचा शिलालेख इ.स. ९८३ ला. त्याही मागे अनेक मराठीचे उल्लेख, शिलालेख सापडतात अगदी इ.स. ६८० च्या ताम्रपटात ‘पन्नास, आणि प्रिथवी’ हे शब्द आहेत म्हणून मराठीची सुरुवात माननारे अभ्यासक आहेत पण भाषातज्नाचे त्यावर एकमत होत नाही त्याचबरोबर ‘धर्मोपदेशमाला’ (इ.स. ८५९) या ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आहे. मराठी भाषा कशी आहे हे त्या दोन ओळीत सांगितले आहे.

”सललयि-पय-संचारा पयडियमाणा सुवण्णरयणेल्ला !
मरहठ्य भासा कामिणी य अडवीय रेहंती !!

मराठी भाषा सुंदर कामिणीप्रमाणे असून ती अटवीप्रमाणे सुंदर गतीची, मदनाने भरलेली आणि चांगल्या वर्णाची असे मराठी भाषेचे कौतुक केलेले आहे. ‘कुवलमाला’ या ग्रंथाचे लेखक उद्योतनसुरी यांच्या ग्रंथात १८ भाषेंचा उल्लेख येतो ही अठरा भाषा बोलणारी माणसे कशी आहेत त्याचा उल्लेख त्यात येतो. पण केवळ ‘मराठा’ या उल्लेखाने मराठा म्हणजे मराठी बोलणारे असे म्हणणे जरा घाईचे होईल. प्राकृत भाषा बोली भाषा म्हणून लोप पावल्यानंतर देशीभाषा सुरु झाल्या या देशभाषा गुप्त राजांच्या काळात होत्या.

सारांश, मराठी भाषेबाबत असे म्हणता येते की, मराठी भाषा ही कोणत्याही एका भाषेपासून सुरू झालेली नाही. महाराष्ट्री आणि अपभ्रंश भाषेचे उपकार मराठी भाषेवर अधिक आहेत. नारदस्मृतीत देशभाषांचा जो उल्लेख आहे तो ‘मराठी’ असा लक्षात घेतला तर मराठीचा उत्त्पत्तीकाळ इ.स. सनाच्या ५ व्या शतकापर्यंत मागे नेता येतो. प्रत्यक्ष मराठी वळणाचे शब्द इ.स. ६८० पासून शिलालेख आणि ताम्रपटात सापडतात.

पण आज तरी मराठी रुपाचे पहिले वाक्य इ.स. ९८३ चे ‘ श्री चावुण्डराजे करवियले’ हेच आहे.

संदर्भ :
१) गोरे, डॉ. दादा : आधुनिक भाषाविज्ञान आणि मराठी भाषा, कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद.
२)शेळके, डॉ. मोहन : प्राचीन मराठी वाड्मयाचा इतिहास, कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद.
३) शेणोलीकर, प्रा. ह. श्री. : प्राचीन मराठी वाड्मयाचे स्वरुप

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 21 April, 2008

गझल

कुठेतरी कुणाचे अस्पष्ट नाव आहे,
आता मी सोसला, तो खोल घाव आहे

तेव्हा मुकीच होते, आता मुकीच आहे
आता मुकेपणाचा झाला, सराव आहे

जातीच्या प्रेमानं मी चिंब चिंब झाले
आता धगीत माझे उद्ध्वस्त गाव आहे

बोललेच नाही, माझ्या व्यथा कुणाला
सोसून सर्व घेणे, माझा स्वभाव आहे

आम्ही येथे भुकेले, तेही तिथे उपाशी
प्रत्येक माणसाला आमचीच हाव आहे.

गावात आम्ही हरलोच बाजी
सजा न द्यावी त्यांना ऐसा ठराव आहे. 

पाचोळाच जीवनाचा झाला अखेर माझ्या
सांगा मित्रहो, माझा दोष काय आहे.

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 2 April, 2008

बाबूराव बागुल

माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. ‘वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास’ अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठं नाव. बाबूराव बागुलांचे ‘ जेव्हा मी जात चोरली होती’ हा कथासंग्रह वाचण्यापूर्वी, साहित्य केवळ ललित असते, ते दलित वगैरे नसते आणि साहित्याचे प्रयोजन केवळ मनोरंजन, आनंदच असते. या वाचन परंपरेला या कथासंग्रहाबरोबर नामदेव ढसाळांच्या गोलपीठा वाचल्यानंतर तडा गेला.

बाबूराव बागुलांचा हा कथासंग्रह म्हणजे साठोत्तरी साहित्य प्रवाहातील दलित साहित्याच्या उदयाच्या काळातील लेखन. याच कथासंग्रहाने दलित साहित्याची पायाभरणी केली. या कथासंग्रहात एकूण दहा कथा. पाच दलित आणि पाच सर्वसाधारण विषयावरील कथा, त्यांच्या या कथासंग्रहातील मला आवडलेल्या वानगीदाखल काही कथा या प्रमाणे……

‘गुंड’ या कथेत आंतरराष्ट्रीय इथोपियन गुन्हेगार झोपडपट्टीत राहत असतो. महाकाय शरीर हे त्याचे वैशिष्ट्ये. त्याच्याकडे कोणीही जात नाही. गेल्या वीस वर्षात त्याने स्त्रीचा चेहरा पाहिलेला नाही. जर्मन वेश्येने त्याला त्याची महाकाय देहयष्टी पाहून नकार दिलेला असतो त्यामुळे स्त्रीविषयक भयंकर संताप त्याच्या मनात भरलेला असतो. अशा गुन्हेगाराकडे झोपडपट्टीतील ’जयंतीबेन’ नावाची स्त्री आईच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्याकडे पैसे मागायला जाते. हा गुंड सावकारास धमकावून पैसे आणतो, जयंतीबेनच्या आईची अंत्ययात्रा काढतो, प्रेताला स्वतः: खांदा देतो. आयुष्यात पहिल्यांदा त्याला रडावे वाटते, अशी ही कथा. वेळप्रसंगी जात धर्म विसरून माणसं कशी एकत्र येतात आणि एक अट्टल गुन्हेगार कसा भावुक, प्रेमळ होतो त्याची ही कथा.

’वानर’ ही कथा एका पहेलवानावर आधारीत आहे. ‘बापू पहेलवान’ त्याच्या सासुरवाडीतील पहेलवानाकडुन कुस्तीत हरल्यामुळे बापू पहेलवान वर्षभर मेहनत करतो, त्याची आई त्याच्यासाठी खर्च करते. आणि नेमक्या कुस्त्या उद्यावर आलेल्या असतात. बापू पहेलवानाची बायको ’सखू’ त्याचे जेवण घेऊन त्याला भेटण्यासाठी जाते. वर्षभर बायकोपासून दूर राहिलेल्या ’बापू’ चा संयम सुटतो. तेव्हा त्याची आई म्हणते तुझ्या बायकोच्या माहेराचा पहेलवान जिंकावा म्हणुन तुझे तपभंग केले. तिचेच कारस्थान आहे. ते ऐकून तो बायकोला रक्तबंबाळ होईपर्यंत मारतो. दुस-या दिवशी बापू पहेलवान कुस्तीच्या डावात हरतो. आणि आईच्या सांगण्यावरून प्रतिस्पर्धी पहिलवानाचा खून करण्याचा तयारीला लागतो अशी ही वानराच्या मेंदूच्या बापू पहेलवानाची कथा.

‘ जेव्हा मी जात चोरली होती’ या कथेतील नायक शिकलेला आहे. त्यामुळे शोषणाची त्याला जाणीव झालेली आहे. तो नवविचाराचा आहे. या कथेतला नायक जात चोरून राहत असतो, पण त्याची खरी जात उघडकीस येते, तेव्हा त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण होते. कथेच्या शेवटी नायक म्हणतो ’त्यांचा मार मी कोठे खाल्ला ? मनूने मला मारले. मारणा-या लोकांचा दोष नाही. त्याच्या मनात मनू आहे म्हणुन त्यांनी मारले अशी ही कथा.

बाबूराव बागुलांच्या लेखनाने मराठी साहित्यात कधीच व्यक्त न झालेला विषय मांडला. त्यामुळे त्यांची कथा वेगळी वाटते. बाबुरावांची कथा प्रथमच झोपडपट्टीतील अनुभव ताकदीने उभे करते. तिथले दारिद्र, तिथल्या पिसाट वासना, तिथले संवेदहीन जगणे, तिथले वातावरण , जीवनाच्या दाहक बाजू, शोषितांचे लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्ये. ‘जेव्हा मी जात चोरली होती’ आणि ‘मरण स्वस्त होत आहे’ या दोनही कथासंग्रहातून वाचकाला एका नव्या जगाची ओळख होते म्हणुन तेव्हा त्या काळात हे कथासंग्रह चर्चेचे ठरले नसतील तर नवल वाटण्याचे कारण नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर

” आम्हाला तुम्ही घर देत नाही. शहरात राहू देत नाही. त्यामुळे मानसिक बौद्धिक उन्नतीची चणचण, झोपड्यात राहायचं. गृहजीवनापेक्षा गलिच्छ जगायचं, आईबापांपुढे, तरुण भावा-बहिणींसमोर,मुलामुलींसमोर स्त्री-पुरुषांचे सबंध यायचे.घाणीत गर्दीत, ओशाळलेल्या मनाने उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे. खून, जुगार,दारुभट्ट्या बघत मुलं वाढायची. अशानं देहातले देव कसे जागृत होतील.” *

त्यांच्या लेखनाने पांढरपेशी वाचकांना धक्काच दिला. त्याच बरोबर टीकाकारांनी त्यांचे लेखन अवास्तव, एकांगी, अस्ताव्यस्त लेखन, कृत्रिम संवाद अशी टिकाही केलीच आहे. तरीही दलित कथेंचे शिल्पकार, अण्णा भाऊ साठे, शंकरराव खरात, आणि बाबूराव बागुल यांचे नामोल्लेख टाळुन दलित साहित्याचे मोठेपण सिद्ध करता येणार नाही.

” मी शतकांच्या स्वप्नांचा अविष्कार आहे, उगवत्या जीवनाचा भाष्यकार आहे” दारिद्र, दु:ख व दैन्य याच्या विळख्यातून दलित मुक्त व्हावा. जुने जग लयाला जावे म्हणुन ते मरणाला आवाहन करतात.ते लिहितात—–

मरणा !

” तु येणार आहेस ना; तर लवकर ये
कायेच्या कल्पवृक्षावरून चैतन्याचा स्वर्गीय पक्षी
स्वर्गात उडून जाण्यापूर्वीच ये.
तू तात्काळ आलास तर अन् तुझा कोमल कर
माझ्या जळत्या जीवाला लागला तर
उरीची संपेल क्षणी जळजळ
बुजतील वळ युगायुगाचे
विरतील ओहळ जुन्या जखमांचे मनामनातले
होईन मी शुद्ध चांगलासा तरुण
कधी कबीर,कधी उमर खय्याम
गेला ज्या चितारुन
मरुन मी मेघासारखा संचारेन वार्‍यावरती
कधी गिरीच्या शिरी राहून
उभा गाईन गीते लखलखती.” *

मात्र एवढ्या मोठ्या लेखकाला आयुष्याच्या शेवटी स्वत:च्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही. स्वत:कडची असलेली, विकत घेतलेली, पुस्तके विकून उपचार करून घ्यावा लागला. या पेक्षा मोठे दुर्दैव काय ? असो….!!!

मराठी साहित्यातल्या एका प्रतिभावंताला एका साहित्य वाचकाची भावपूर्ण श्रद्धांजली !!!!

* संदर्भ: दलित साहित्य वेदना आणि विद्रोह - भालचंद्र फडके.

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 17 March, 2008

रानफुले

डोंगरांना बाजूला सरकवून
जेव्हा सुर्य वर येईल,

तेव्हा तु समोरी  जा
हातात रानफुले घेऊन

तेव्हा मीही
धबधबता कोसळणारा
प्रवाह होईल, तुझ्या 
मना-मनातुन  वाहणारा

अन्

दुरवर माणसांच्या जंगलात
तुझीही एक हाक पेरुन ठेव
वाढणार्‍या झुडंपाबरोबर
मीही उगवेन ह्ळूहळू .

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 14 January, 2008

काही चारोळ्या !!


अंकुर जळण्याच्या भीतीने
मी रुजणं थांबवलं नाही
कोमजण्याच्या भीतीने
मी फुलणं थांबवलं नाही.

व्याकरण म्हणजे असते
ग्रेसची कविता,
चर्चा करायची असते
काहीही न समजता.

बोलतांना ती माझ्याशी
नजरेला नजर देण्याचे टाळायची
भेटण्यासाठी आली तरी
मोबाईलच्या बटणांशीच खेळायची.

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 13 January, 2008

संक्रात कशावर !!! एक अफवा.

        नमस्कार, संक्रात उद्यावर आलीय. बायकांची संक्रातीची तयारी झाली आहे. घरात हलवा करण्याची पध्दत केव्हाच संपली आहे. तीळगुळाच्या वड्या, लाडू, साडी किंवा पंजाबी ड्रेस घेवून झालंय. हळदी कुंकवाला कोणती वस्तु भेट द्यायची हे सुद्धा ठरुन झाले असेल………………!!
पण, संक्रातीचे एक वैशिष्टे आहे ती आल्यावर दरवर्षी वेगवेगळ्या अफवा घेऊन येते. संक्रातीबरोबर हे केव्हा सुरु झाले ते मात्र आम्हाला कळत नाही !!! यंदाची संक्रात लाल कपडे घालून आलीय….त्यामुळे लाल काहीही वापरायचे नाही. अशी एक अफवा आहे,  त्याचबरोबर कधी जावई असलेल्या सासूने जावयाकडून हिरवी साडी घ्यावी, कधी जावयाला शर्ट-पॆंट घ्यावा लागतो, कधी तीळगुळ आन नंदेला बांगड्या भराव्या लागतात, मामीनं भाच्याकडे गोडधोड खावं ! ( अशा बातम्या कळल्या की आम्हाला हसुन-हसुन  वेड लागायची वेळ येते. )

          यंदाच्या संक्रातीबद्दल “ही” म्हणत होती, आज आपल्याकडे माझी एक परिचयाची पण, ब-याच दिवसात न भेटलेली मैत्रीण आली होती, ती म्हणाली ताई तुम्हाला किती मुले ? मी म्हणाले एक, तर ती म्हणाली, यावेळेला ज्यांना-ज्यांना एक मुलगा आहे, त्यांनी सात घरातील सात बायांकडून एक रुपया, दोन रुपये, किंवा पाच रुपये, मागायचे आणि त्या पैशात बांगड्या घ्यायच्या आणि त्या संक्रातीपर्यंत घालायच्या- आणि नंतर काढल्या तरी हरकत नाही. असे जर केले नाही तर मुलाला धोका होऊ शकतो, तेव्हा मला काही तरी द्या !!!!हीने तिला खूप समजावले आणि पैसे द्यायला नकार दिला. पण, कालपासून हीचेही डोके फिरले आहे, ती म्हणते, ही अंधश्रद्धा असेल किंवा नसेल पण मी ही सात घरात जाऊन येते !!

               दोस्त हो,  एकविसाव्या शतकात व्रत वैकल्य आणि रुढीचा विचार करतांना धकाधकीच्या काळात काही सण मौजमजेबरोबर आयुष्याची रंगत वाढवतात. पण, अशा धार्मिक रुढींबरोबर, सणांबरोबर या संस्कारांना जोडून अशा अफवा येत असतील आणि महिलांमधे अंधश्रद्धा वाढवत असतील तर आपण हे प्रकार किती काळ सहन करायचे ? याचाही नक्कीच विचार झाला पाहिजे असे वाटते ?

    या बरोबर आणखी एक अफवा आली आहे, पण ती पुढल्या वेळेला सांगेन !!! आम्ही मात्र तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इतकेच मित्र परिवाराला सांगणार आहोत आपण काय म्हणता  !

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 16 December, 2007

देवगिरी किल्ला: दौलतींचे शहर ( दौलताबाद)

नमस्कार मिसळपाव,उपक्रम,किंवा माझे शब्द या मराठी संकेतस्थळांवर लेणी स्थापत्याबद्दल काही लेखन टाकावे. या उद्देशाने एक दिवस वेरूळ लेण्यावर पोहचलो. पण, तिथे हा फलक पाहिला. जरासा नाराज झालो.

20112007078

देवगिरीचा किल्ला

आणि मग दौलतींचे शहर म्हणून विख्यात असलेल्या दौलताबादला भेट द्यावी, असा विचार केला. खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात आणि तोच वृत्तांत आपणासाठी इथे टंकत आहे. इतिहास आमचा कच्चा असल्यामुळे, काही चुकीचे लिहिले असेल तर ते आपण तपासून घ्यावे. या शहराने आणि किल्ल्याने अनेक वंशाचे उत्थान पाहिले. यादव, खीलजी, मोगलवंश हे त्यापैकी आहेत, असे म्हणतात.

महाराष्ट्रात जे काही भुईकोट किल्ले आहेत त्यापैकी हा एक. युद्धपद्धती आणि युद्धकलेतील गरजांच्या फेरबदलांना अनुसरुन या किल्ल्याची रचना आणि बांधणीही वेळोवेळी होत गेली असावी. याचसाठी दौलताबादचा किल्ला सैन्यवास्तुकलेतील प्रगतीचे प्रतीक म्हणून गणला जातो.

ह्या किल्ल्याचा नकाशा, भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना अशी योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेली आहे की, शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित राखता येईल असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रुसैन्याच्या सहज प्रवेशाला थोपवून धरतात. तर उंच,उंच भिंती किल्लेबंदी करणा-या उरतात. संपूर्ण किल्ला चहूकडून जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची गाठण्यासाठी डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेल्या दूर्गम, अतिसुरक्षित असे अंधारे बोगदे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते की, शत्रुची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली असावी.

किल्ल्याच्या एका बाजूला दहा कि,मी. भिंत पसरलेली आहे. किल्ल्यात प्रवेश करतांना एक महादरवाजा आहे, या दरवाजावर हत्तींचा हल्ला थोपवण्यासाठी टोकदार खिळे ठोकण्यात आलेली आहेत. यातून प्रवेश केल्यावर प्रत्येक गल्लीत पहारेक-यांच्या कोठड्या बांधण्यात

20112007081

किल्ल्यामधे प्रवेश करतांना अनेक मोठे दरवाजे पार करावे लागतात.

आलेल्या आहेत. या कोठड्यामधे काही जूनी वापरण्याजोगी अवजारे ठेवण्यात आली

20112007253

चांद मिनार

आहेत. इथेच हत्ती हौद आहे. तसेच जैन मंदिरही आहे. पुढे त्याची तोडफोड करुन येथे मशिद उभारलेली आहे, आणि नंतर त्याचीही तोडफोड करुन तेथे आता एका भारतमातेचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. हे बद्ल स्वातंत्र्यानंतर झाले असावेत.

चांद मीनार. या मंदिरातून म्हणजे रस्त्याच्या डाव्या बाजूला हे मंदिर आहे तर उजव्या बाजूला चांद मिनार आहे. दोनशे दहा फूट उंचीचा एक गोलाकृती मीनार येथे आहे. आता तो प्रवेशासाठी बंद करण्यात आलेला आहे.चांदमीनाराच्या पुढे कालाकोट प्रवेशाद्वारानजिक हेमांडपंथी मंदिराचे भग्नावशेष सापडतात.पण आता या किल्यावरुन ते हटवण्याचे काम चालू आहे, पुरातत्वे विभागाला त्याच्याशी काही घेणे नाही. अशा अविर्भावात ते सर्व रस्त्याच्या कडेला पडून आहेत.

20112007118

चीनी महल

भिंतीचा तिसरा भक्कम भाग कालाकोटचे प्रवेशद्वार, पुढे एका डोंगरावर आहे, यावर पोचण्यासाठी पाय-या बांधण्यात आलेल्या आहेत. इथे तीन दरवाजे समकोन स्थितीत आहेत. शत्रुसैनिकावर समोरुन आणि मागच्या बाजूस हल्ला करता यावा या उद्देशाने तशी रचना असावी असे वाटते. याच्या वरती उंचावर एका महालाचे अवशेष असून या महालाला चीनी महल म्हटल्या जती. यातील सजावटीसाठी चीनी टाइल्स वापरण्यात आल्या होत्या. औरंगजेबाने गोलकोंडाचा अंतिम राजा सुल्तान आबूल हुसैन तानाशाह आणि विजापुरचा अंतिम शासक सुल्तान सिकंदर यांना इथेच कैदेत ठेवलेले होते.

रंग महाल येथुन डावीकडे एक लहानश्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर रंगमहालाचे भग्नावशेष सापडतात विभिन्न खोल्या आणि महालाच्या

20112007237

रंग महाल

सुनियोजित बांधणीव्यतिरिक्त यातील खांब आणि खणामधील लाकडांवर केलेलं नक्षीकाम पर्यटकांना गतवैभावाची आठवण करुन देतात.(इथेही आता प्रवेश करु देत नाही. पाच रुपयाची लाच देऊन इथे प्रवेश करता येतो.लोकांना याची उत्सुकता असत नाही. आणि लोक इथे प्रवेशाचा हट्टही करत नाही. कारण तिथे पाहण्यासारखे काय आहे, असे म्हण्तात.)

मेंढा तोफ या तोफेचे मुळ नाव शिकन तोफ होती असे म्हणतात. पण तिच्या आकारावरुन तिला मेंढा तोफ असे आता नाव प्रचलीत आहे. या तोफेवर दोन उल्लेख आहे, संपूर्ण खिताबासहीत एक औरंगजेबाचा आणि दुसरा तोफ निर्मात्याचे नाव मुहमद-हुसेन अमल-ए-अरब असे लिहिलेलं आहे. असे मार्गदर्शकाराने सांगितले. बुरुजाच्या मध्यभागी तोफेचे तोंड फिरवण्याची व्यवस्था आहे.जेणेकरुन दुर-दुर मारा करण्यात यावा.

20112007120

किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी यादवकालीन मार्ग

दरी महालाच्या सभोवताली डोंगर पोखरुन केलेली दरी दिसते ते साधारणतः पन्नास

20112007121

किल्ल्यावर प्रवेशासाठी आधुनिक लोखंडी पूल.

ते शंभर फूट खोल असावी. इथे या किल्ल्यात वरच्या बाजुला प्रवेश करण्यासाठी एकमेव रस्ता आहे. आणि सर्व बाजूंनी दरी आहे. आता किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एक आधुनिक पुल लोखंडाचा पर्यटकांसाठी केलेला आहे. आणि जुना पुल काहिसा विटा आणि दगडाचा वापर करुन बांधलेला आहे. हाच पुल पुर्वी पर्यायी रस्ता म्हणून वापरण्यात येत होता. दरीतील पाण्याची पातळी उभयबाजूंवरील बंधा-यावरुन नियंत्रीत करण्यात येत असे. धोक्याचे प्रसंगी शत्रुसैन्याला थोपवून धरण्यासाठी कोणत्याही एका धरणातून पाणी दरीत सोडण्यात येत असे आणि दुसरे धरण बंद करण्यात येई. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असे. या प्रकारे धोक्याच्या वेळेस हा पूल पाण्याखाली जात असे. आणि जो आधुनिक पूल दिसतो त्याचा उपयोग क्वचित प्रसंगी करतही असतील असे वाटते. म्हणून या किल्ल्यावर हल्ला करणे केवळ अशक्य असे वाटते. अर्थात फितुरीमुळे या किल्ल्याची वाट लागली हे सांगण्याची काही गरज नाही.

20112007129

या डोंगरावर किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी, आणि शत्रुची दिशाभुल करण्यासाठी जागोजागी इथे वाटा आहेत. भुयारी मार्ग आहेत. इथे पुल ओलांडला की, काही अंधारे रस्ते ओलांडावे लागतात. इथे माणूस हरवल्यासारखा अनुभव येतो प्रत्येकाला हा किल्ला ओलांडून जाण्यासाठी या अंधा-या पाय-या ओलांडाव्याच लागतात. आणि यालाच समांतर असा एक पर्यायी रस्ता इथे आहे, ज्याच्यातुन इथे मार्गदर्शन करणारे, किल्ला अजिक्य कसा राहिला. शत्रुवर उकळते तेल टाकण्याच्या जागा कोणत्या, शत्रुने प्रवेश केल्यावर तो जर चुकीच्या मार्गाने गेला तर सरळ दरीतच कसा जाईल. गुप्त कोठड्या, धुर सोडून शत्रुला अडवण्याची पद्धत, भुयारातुन लहान-सहान चाके सरकवून त्याचा फासासारखा वापर हे सर्व अद्भुत आहे, ते मात्र मार्गदर्शकाकडूनच पाहिले आणि ऐकले पाहिजे. हेच या किल्ल्यात पाहण्यासारखे वाटते. अजूनही इथे धोकादायक रस्ते, या अंधा-या गुहेत आहेत. मार्गदर्शकाशिवाय या रस्त्याने प्रवेश करु नये. किंवा मार्गदर्शकाचा उपयोग घ्यायचा नसेल तर सोप्या मार्गाने जावे, तो पार करतांनाही अंधा-या रस्त्याचा वापर करावा लागतो. भिंतीचा आधार घेत-घेत हा रस्ता विना-मार्गदर्शकाशिवाय अनेक पर्यटक हा रस्ता सहज पार करतात.

डोंगराळ वाटेवरच पाय-याची रांग लागली की तिथे एक गणपतीचे मंदिर आहे, तेव्हा केव्हापासून आहे, हे कोणासही निश्चित सांगता येत नाही.

20112007166

बारादरी (बारा दरवाजांचे निवासस्थान )

बारादरी दमलेले पर्यटक जेव्हा पाय-यावरुन वर पोहचतात तेव्हा इथला बारादरीतले भव्य महालाच्या दर्शनाने जराशी विश्रांती घेतल्यावर सुखावतो. बारा कमाणी असलेली ही इमारत आहे, इथे अष्ट्कोणी खोल्या आणि या खोल्यांची छत घुमटाकृती आहेत. त्यालगतच्या खोलीत लोखंडी खिडक्या आहेत. प्रत्येक दारावर एक खिडकी असून त्यातून मनोरम देखावे बघता येतात. बारादरीचे बांधकाम दगड-चुन्याने केलेले दिसते. चुन्याच्या थराचे डिझाईन मोहक आहे. इथे एक पाणी विक्रेता आहे एक रुपयात एक ग्लास विकून पर्यटंकाची तहान तो भागवतो.इथून पुढे गेले की, पुढे शिखर बुरुज आहे. शिखराकडे कडे जातांना डोंगर पोखरुन एक गुहा इथे दिसते.

20112007220

जनार्धन स्वामी (किल्लेदार)इथे निवास करत असत

एकनाथांचे गुरु आणि या किल्ल्याचे किल्लेदार जनार्धनस्वामी इथे निवास करीत असे म्हणतात. राजकारण आणि युद्धानी त्रासलेल्या सामान्य जनतेस ते उपदेश, मार्गदर्शन करीत. किल्लेदार असुनही त्यांनी धार्मिक जीवनाची कास धरली संसारात अटकलेल्यांना आणि अध्यात्माची कास धरणा-यां सर्व धर्मियांना ही एक हक्काची जागा तेव्हा वाटत असावी.

याच गुहेत दोन भाग आहेत. एकीकडे अखंड प्रवाह असलेली जलधारा इथे आहे, मोतीटाका हे जलाशयाचे नाव. प्रत्येक रुतुत इथे पाणी साठलेले असते आणि याच साठविलेल्या पाण्यातुन येणा-या पर्यटकांची तहान एक-एक रुपयात बारादरीत ती मिटवीली जाते. पर्यटकांना माहित नसल्यामुळे धुर्त पाणी विक्रेता ते पाणी इथुनच आणून विकतो. सहजपणे, हाताने पाणी घेऊन पीता येणारी जलधारा याच गुहेत आहे.

20112007199

किल्ल्यावरील सर्वात उंच भाग

शिखरावर येईपर्यंत तीन-चार वेळेस बसत-उठत एकदाचा शिखरावर पोहचलो. श्वासोश्वासाची गती वाढलेली होती. थकून गेलो होतो. या पेक्षा वेरुळलेणी पाहणे परवडले असते असे शिखरावर आल्यावर वाटत होते आणि तेव्हाच या उंच जागेवरुन शहरातील आणि आजूबाजूचा डोंगरांचा परिसर नजरेत बसल्यावर येण्याचा थकवा आणि आलेला कंटाळ्याचा विचार दुर निघून गेला. चारही बाजूने उंच उंच दिसणारे डोंगर अत्यंत सुंदर दिसते .बाला हिसार हा शिखरावरील सर्वात उंच भाग आणि इथेच श्री दुर्गा नावाची तोफ

</tr

20112007209

शिखरावरील दुर्गा तोफ

आहे. किल्ल्याचा सर्वात उंच भाग हा आहे. इथेच विजयी द्ध्वज लावण्याची व्यवस्था आहे, थकलेला पर्यटक इथे कितीतरी वेळ नुसता बसून असतो.

अतिशय सुरक्षीत असलेला यादवांच्या किल्ला केवळ फितुरीमुळे सत्तांतर झाले.त्या किल्ल्याचे केवळ आता भग्नावशेष शिल्लक राहिले, ज्यांच्या काळात बोली भाषेला प्रमाणभाषेचा दर्जा मिळाला, ज्यांच्या भरभराटीच्या काळात समृद्ध शेती जीवनाने काळ बहरलेला. होता. यादवांचे प्रशासन, त्यांच्या छत्रछायेत साहित्य आणि कलेने चमोत्कर्ष गाठलेला होता. इतिहासात उल्लेख केलेल्या लुटीचा येणारा उल्लेख… सहाशे मण सोने,सात मण मोती,दोन मण हिरेमाणकं आणि लक्षावधी रुपये, लुटले गेले. यादवांच्या पराभवानंतर झालेली प्रचंड लुटमार, अग्निकांड, आणि विनाशतांडवामुळे देवगिरीचे सौंदर्य पार कोमेजुन गेले. या आणि इतर इतिहासाच्या आठवणीने आम्ही किल्ला केव्हा उतरलो ते कळलेच नाही.

20112007223

बारादरीवरुन घेतलेले छायाचित्रे
20112007214

किल्ल्यावरुन दिसणारी तटबंदी

देवगिरी किल्ला : दौल्ताबाद. ता. जि. औरंगाबाद महाराष्ट्र ( औरंगाबादपासून १० कि. मी. अंतर )

Older Posts »

Categories