Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 1 डिसेंबर, 2007

सिद्धहस्त कवी,लेखक,समीक्षक : प्रा. केशव मेश्राम.

  प्रा. केशव मेश्राम यांची काही व्याख्याने ऐकण्याचा योग प्रबोधन वर्गाच्या निमित्ताने आम्हास आलेला आहे. अतिशय साधा माणूस. आपण मोठे साहित्यिक आहोत असा आव कधी दिसला नाही. दलित साहित्य, दलित चळवळ, आणि नवलेखकांना प्रेरणा देणारा साहित्यिक म्हणजे, प्रा. केशव मेश्राम. साठोत्तरी साहित्यानंतर ज्या विविध साहित्यप्रकारांनी जन्म घेतला आणि दलित साहित्याकडे वाचक जेव्हा कुतुहलाने पाहू लागला तेव्हा चळवळीला आणि दलित साहित्याला दिशा आणि गती देणारे जे साहित्यिक होते. त्यात प्रा.केशव मेश्रामांचे नाव अग्रक्रमाने घेतले पाहिजे. कवी, कादंबरीकार, आणि समीक्षक म्हणून त्यांची ओळख साहित्य वाचकांना नवी नाही.’अस्मितादर्श’ या नियतकालिकाच्या मेळाव्यापासून चळवळीचे  आणि साहित्यामधून  उपेक्षीतांच्या जीवनाचे चित्रण आपल्या लेखनातून त्यांनी मांडले. ‘उत्खनन’ ‘जुगलबंदी’ ‘अकस्मात” चरित’ हे त्यांचे काव्यसंग्रह.  ‘पोखरण’ ‘हकीकत आणि जटायु ‘या कादंब-या.  नंतर ‘खरवड’ ‘कोळीष्टके’ ‘मरणमाळा ‘आणि असे बरेचसे लेखन आहे.  मला आवडते ते त्यांचे ‘अक्षर भाकिते’ हे पुस्तक.  फारच सुंदर आणि वेगळ्या विषयांचे विवेचन त्यात आहे. काही विषयाचे केलेले विवेचन संशोधनाच्या दृष्टीने केवळ दलित नव्हे, तर अगदी दलितेतर  विषयाकडे खूल्यापणाने पाहण्याचा त्यांचा  स्वभाव सहीच होता, ते या पुस्तकातुन दिसून येते.  ग्रामीण आणि शहरी दलितांची गुंतागुंत, साहित्याची वैचारिक स्थिंत्यंतरे, गुन्हेगारीकडे झुकलेल्या पिढीचे चित्रण,  असे विविध विषय त्यांनी हाताळले

                 साहित्य ललित असते, पण ते दलित कधी असते का ? साहित्य उत्तम किंवा सामान्य असते पण ते ‘दलित’ कसे असेल ? साहित्य वैचारिक, राजकीय, धार्मिक किंवा पंथीय असेल, पण, ते ‘दलित’ असणार नाही. असतच नाही.  या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे देतांना- “दलित साहित्य ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तूत्वाने जागरूक झालेल्या, अस्मितेच्या शोधाने सर्व घातक धर्म, विचार, रुढी, संकल्पना, उक्ती, ग्रंथ आणि रुढी  यांना नकार देणा-या आणि नवसंस्क्रुतीच्या निर्माणाची, समतायुक्त सम्यक वाटचाल करणा-यांच्या संघर्षाची अस्तित्वात आलेली राजरस्ता होऊ पाहणारी ठळक पायवाट असेच म्हणावे लागेल” १ 
                 दलित साहित्य, त्याच्या संकल्पना, त्या अनुषंगानेच्या चळवळी तसेच लोककलेच्या अनुभवाचे जागरुक मंथन त्यांनी केले. आपल्या मानसिकतेत  ‘अध्यात्म ‘ अतिशय प्रभावी आहे, त्याचे समाज व समाजाच्या दुखण्याशी असलेले नाते व फलश्रुती हे आजच्या काळात पडताळून पाहणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. साहित्यप्रवाहातील आणि प्रकारातील स्वीकारलेल्या तत्वाचा अखंडपणे पुरस्कार करणा-या,  उपेक्षितांच्या दु;खांना आणि वेदनांना मांडणारा एक भाष्यकार काळाच्या पडद्याआड गेला आहे, विद्रोह हा विंध्वंसक नसून तो संयमीही राहू शकतो हे त्यांनी आपल्या साहित्यकृतीतून सिद्ध केले…………!

               मराठी साहित्यातील  सिद्धहस्त कवी, लेखक, समीक्षक व विचारवंताला एका रसिक वाचकाची   विनम्र श्रद्धांजली !!!


Leave a response

Your response:

प्रवर्ग