महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात भटक्या विमुक्तांच्या सर्वच थरातून जागृती होतांना आपल्याला दिसते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे सामाजिक क्रांतीचा पाया रचला गेला आणि उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची जाणीव निर्माण झाली. आणि शिकलेली पिढी आपल्या हक्काबद्दल आपल्या समाजातील व्यवस्थेवर लिहायला लागली. अशा गावगाड्याचे चित्रण अनेकांनी केले. मात्र एकाच जातीबद्दल संदर्भासहीत अभ्यासपूर्ण लेखन ‘वडार समाज इतिहास आणि संस्कृती’ या भीमराव चव्हाण यांच्या पुस्तकात वाचायला मिळते.
एकूण नऊ प्रकरणे असलेल्या या पुस्तकात ‘वडार समाजाच्या इतिहासापासून ते वडार समाज घटनात्मक सवलीतीपासून कसा वंचित आहे’ इथपर्यंत मांडणी या पुस्तकात केलेली दिसते.
महाराष्ट्रात गावकुसाबाहेर पाल टाकून राहणा-या समाजापैकी एक म्हणजे ‘वडार’ समाज. वडार समाजाचे मूळ स्थान ओरिसा [ओडिसा]. ओडू राजामुळे उत्कल [ओडू] देश म्हणूनही तो ओळखल्या जातो. वडार समाजाचा मुख्य व्यवसाय खाणकाम, मातीचे काम, वाळू-दगड आणि बांधकामास साहित्य पुरविणे. विहिरी खोदणे, इत्यादी. वडार जातीच्या लोकांमधे व्यवसायावरुन पोटभेद आहेत गाडीवडार, मातीवडार, पाथरवट इत्यादी. वडार समाजाची भाषा तेलगुमिश्रित अशी आहे. काही ठिकाणी ओडियाही बोलल्या जाते. अशी बरीच माहिती सदरील पुस्तकात वाचायला मिळते. त्याचबरोबर दगड फोडून वरवंटे, पाटे बनविणा-या या समाजाकडे हा व्यवसाय कसा आला त्याबद्दलही एक आख्यायिका वाचायला मिळाली.
” नाशिक येथील पंचवटीमधे सीता एका शिळेवर बसून अंघोळ करीत असतांना एका वडाराने चोरुन पाहिले. अंघोळ करुन गेल्यानंतर या वडाराने त्या शिळेचा हातोडीने दोन तुकडे केले. त्यातील एक दगड तो वडार घेऊन गेला. त्यानंतर सितेने येऊन पाहिले तेव्हा शिळा फुटल्याचे दिसले. त्याचा राग येऊन सीतेने शाप दिला की, यापुढे तू दगड फोडत राहशील. तेव्हापासून आजपर्यंत वडाराचे वंशज दगड फोडण्याचे काम करीत आहेत ” पृ.क्र.१९७
अशा अनेक कथा, आख्यायिका, याची तपशिलवार माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. वडार समाजाचा इतिहास, ओड्र मूळ क्षत्रिय कसे आहेत, वडार शब्दाची उत्पत्ती, वडार समाजाच्या उपजाती, संस्कृती, ब्रिटीशांनी लादलेला गुन्हेगारी कायदा, लोकसाहित्य व लोकगीते, बोलीभाषा व लोकसमजुती पुस्तकात वाचायला मिळतात.
भारतातील प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारा ‘वडार’ समाज आजही फारसा बदललेला दिसत नाही. त्याची भाषा, लोकगीते, रुढी-परंपरा, राहणीमान, वेशभूषा, यात फारसा बदल झालेला दिसत नाही. अजूनही या समाजामधे बदलांची मानसिकता दिसून येत नाही.
‘वडार’ समाज शिक्षणापासून दूर राहिल्यामुळे हालअपेष्टा पाचवीलाच पुजलेली. सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय मागासलेपण आजही या समाजातून दिसून येते. सामाजिक चळवळ आणि घटनेने दिलेले अधिकार यावरही चर्चा ‘वडार समाज घटनात्मक सवलीपासून वंचित’ या प्रकरणात दिसते.
‘वडार’ समाजाचे वास्तव चित्रण, वडारांच्या समस्या, आणि वडार समाजाबद्दल नवनवीन माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लेखकाने केलेले आवाहन या पुस्तकातून वाचायला मिळते. समाजशास्त्रीय अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल असे वाटते.
‘वडार समाज
इतिहास आणि संस्कृती’
लेखक : भीमराव व्यंकप्पा चव्हाण
स्वाभिमान प्रकाशन, औरंगाबाद.
मूल्य २५०/- रुपये.
नेमक्या शब्दात छान घडवलात पुस्तक परिचय.
By: प्रमोद देव on 19 एप्रिल, 2010
at 10:56 सकाळी