Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 17 फेब्रुवारी, 2014

माझ्या सुखासाठी तुला….वणव्यात कसा धाडू मी

‘माझ्या सूखासाठी सखे तुला वणव्यात कसा धाडू मी’ मला अजिंठा काव्यसंग्रहातील ओळी आठवतात. तू वेगळी तुझी माणसं वेगळी, तरीही येतेच तू भेटण्यासाठी. मी तूला पाहतो प्रभातवेळी दरवळणा-या पाखरांच्या गाण्यात. दुपारच्या वेळी भूरभूरणा-या वा-याबरोबरही पाहतो ’तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकूरे’ अशा स्वरातील सुगंध  पोहोचतो दरवेळी माझ्या मनात. आणि मग मी हरवून बसतो माझा मलाच. तुला पाहतांना.  कोणतेही वास्तव भास मला जागे करत नाहीत. जाणीवेची फुले उमलायला लागतात. तुझं खळखळून हसण्याचं चांदणं मी पिऊन टाकतो. तुझं नितळ गाणं खोल रुतून बसायला लागते. उंच टेकडीवरून बघतो  आपण शहराकडे मी रुतलेला तूही रुतलेली. बस क्षण गोठून गेले पाहिजेत असं वाटायला लागतं

एखादा दिवस आणि तीही डिसेंबरातली सायंकाळ. मंदिराच्या परिसरात तू आणि मी आपल्याच नादात. मंदिरात किती ती शांतता असते. भजनाचे हलके सूर तेव्हाच तुझ्या माझ्या गप्पांना पूर. पु.शि.रेगे म्हणतात ‘तशी झाडं पानात यायला लागतात’ आकाशाच्या खिडक्या मिटायला सुरुवात होते’ तु चाफ्याची फुलं ठेवतेस माझ्या हातात. थंडीतला तुझा उबदार स्पर्श. दूर झाडीतून एक थंड हवेची झुळुक हलकेच तुझ्या माझ्यातून वाहात जाते, ‘किती थंड असतो रे तुझा तळहात’ अंगावर सांडलेली ऊब मला काहीच सूचू देत नाही. तु हलकेच अंगावरुन मोरपिस फिरवावा तशी हलके हलके बोलत असतेस. मी निरखत असतो तुला.. ‘वा-याच्या बोटांनी तुझ्या चेह-याच्या तळाशी गेलेली पाने भराभर उलगडून पाहतो, . तु मला मी तूला वाचत असतो. सर्वांगातून लहरत जातो आपण. मंदिरात आता शांतता ‘आता निघलं पाहिजे’ थंडीत तुला काहीही सुचतं जातं.  मनातल्या घुमटात आवाज घुमत जातो.  मी हसतो तुला. चल, आता निघलं पाहिजे. एकमेकांचे हात एकमेकांच्या हातातून सुटत नाही. तीच ओढ, तीच हुरहुर, निरोप घेतांना डोळ्यात दाटलेलं आभाळ आपण दिसू देत नाही, दूरपर्यंत जातांना पाहात राहतो मी तुला आणि माझं एकेक पाऊल तुझ्याभोवतीच रेंगाळत चालते डिसेंबरातली एका सायंकाळ आणि मग म्हणावं लागतं—-

हर रोज हमें मिलना हर रोज बिछडना है.
मै रात की परछाई तू सबह का चेहरा है.


यावर आपले मत नोंदवा

प्रवर्ग