दिठी, एका सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणा-या सुखदु;खाची गाथा सांगणारी एक छोटीशी गोष्ट. अतिशय तरल, सुंदर, भावनांचा कल्लोळ, मनात निर्माण होणारे असंख्य विचार, सतत हिंदकळत राहावेत अशी एक उत्तम कलाकृती. एखादी सुंदर कथा, कादंबरी, वाचून झाल्यानंतर किंवा एखादं गाणं डोळे मिटून ऐकत राहावे, पुस्तक छातीवर उपडं करून त्या कथेत, संगीत मैफलीत रमून जावे त्यातून बाहेर पडूच नये असा आनंद देणारी कथा म्हणजे ‘दिठी’ मराठी चित्रपट.

चित्रपटाची सुरुवात रामजीच्या एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने सुरू होते. रामजीचा मुलगा पावसात आलेल्या पुरातील भोवऱ्यात वाहून जातो, येथून हा चित्रपट हळूहळू पुढे सरकायला सुरुवात होते. रामजी हा लोहार काम करणारा ग्रामीण भागातला एक बलुतेदार आहे. गाव अतिशय सुंदर, टुमदार आहे, हिरवाईने नटलेले आहे, आणि सतत आभाळ आणि पावसाने भरलेले आहे. चित्रपटात येणारी पात्र अगदी मोजकी आहेत. सतत कोसळणारा पाऊस याचं छायाचित्रण तर अतिशय सुरेख आहे. अशा रामजीच्या आयुष्यातलं दुःखाची गोष्ट. मुलाच्या जाण्याने आपल्याच दुःखात गुरफटलेला रामजी. (किशोर कदम) जगण्यात आता काही रस उरलेला नाही. जगातच काही उरलेले नाही अशावेळी एक नवी आशा, एक नवी उर्जा, नवीन सर्जनात्मक गोष्ट घडते, एक नवा अंकुर रामजीच्या जीवनात घेऊन येतो त्याची ही कथा.
‘आता आमोद सुनासी आले’ या दि.बा.मोकाशींच्या लघुकथेवरील हा चित्रपट. दिग्दर्शन सुमित्रा भावे यांचे आहे. चित्रपटात माउलीचे दोन अभंग आहेत. पात्र, रामजी (किशोर कदम) जोशीबुवा ( डॉ.मोहन आगाशे) संतु वाणी ( दिलीप प्रभावळकर) गोविंदा (गिरीष कुलकर्णी) पारुबाई ( अमृता सुभाष) आणि अशा काही मोजक्या अभिनेत्यांच्या अभिनय तर उत्तमच झाला आहे, पण पाऊस हा एक खलनायक तर हंबरणारी गाय हे या चित्रपटातील कळवळून टाकणारी पात्र आहेत. छायाचित्रण तुषार पंडित यांचं अतिशय उत्तम दर्जाचं झालं आहे. एकूणच या सर्व टीमने एक वेगळी अशी कलाकृती निर्माण केली आहे.
दिठी म्हणजे दृष्टी, जगण्यातील वास्तवाकडे पाहण्याची दृष्टी. तीन दशके पंढरीचा वारी करणाऱ्या रामजीचा एकुलता एक मुलगा हिरावून गेल्यानंतर विठठलाला प्रश्न विचारणारा रामजी. अनेकांच्या दु:खात पांडुरंग म्हणून उभा राहणारा रामजी मात्र स्वतःच्या दु:खात कोलमडून जातो. आजूबाजूचा मित्रपरिवार, आठवड्याला पोथी-पुजा करणारे मित्र, समजवणारे सहकारी हे सर्व खोटं वाटायला लागतात. सोबत असलेला सावळा विठ्ठल सुद्धा आपल्याला मदत करीन नाही, अन्याय करतो तेव्हा रागाच्या भरात विधवा तरुण सुनेला जी ओली बाळंतीण असते तिला आणि तिच्या लहानमुलासहित ‘निघून जा’ म्हणणारा रामजी अतिशय उत्तम अभिनयाने जबरदस्त साकारला आहे. चित्रपटातील संवाद फार संथ आहेत, असे वाटायला लागते, अर्थात ते वातावरणास पोषक आहेत, आणि कलाकृतीला एका उंचीवर नेण्यास भाग पाडते असेही वाटते. संवादापेक्षा आजूबाजूचं चित्रपटात आलेलं चित्रण- वातावरण हे या चित्रपटाची खरी ताकद आहे. सव्वा तासाचा चित्रपट आहे, एक चहाचं दुकान, वाहणारी नदी, पाऊस, दिंडी, आणि दोन अभंग आपल्याला एका वेगळ्याच विश्वात नेतात. आणि सर्वांगसुंदर असा आनंद आणि अनुभूती देतात असे वाट्ते.
मराठीत अनेक आशयघन चित्रपट देणाऱ्या सुमित्रा भावे यांचा हा शेवटचा चित्रपट. हा चित्रपट बनविताना कलाकार, दिग्ददर्शक यांना आर्थिक पाठबळाशिवाय हा चित्रपट उभा करावा लागला असे वाचनात आले, सिनेमाला मदत करणारे हात आखडत गेले, शेवटी मोहन आगाशे यांनी स्वतःहून हा आर्थिक डोलारा सांभाळला, सिनेमातील कलाकारांनीही मानधन घेतले नाही, चित्रपट एकदा पडद्यावर येऊ द्या, मग बघू असे कलाकार म्हणाल्याचे वाचण्यात आले. दुर्दैवाने करोनाकाळ असल्यामुळे सिनेमा मोठ्या पडद्यावरही येऊ शकला नाही, अडलेल्या हंबरणाऱ्या गायीसारखीच या सर्व टीमची अवस्था झाली असे म्हणावे लागेल.
रामजीचं दुःख कशामुळे हलकं होतं, तो त्यातून बाहेर पडतो का ? त्याचं आकाश मोकळं होतं का आणि का होतं ? चित्रपट आनंद देतो काय ? यासाठी दिठी बघायलाच हवा. ‘सोनी लीव’ वर २१ मे पासून चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा