Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 2 सप्टेंबर, 2019

गुलमोहर


विद्यापीठाच्या आवारातून तिच्यासोबत फिरतांना,
गुलमोहराची कुजबूज ऐकलीय मी….

झाडाखालून चालतांना,
तिच्या पैंजणाचा आवाज ऐकुन
फुलांनी केलेला वर्षाव पाहिलाय मी…

तिच्या गप्पात रंगुन जातांना
पान न पान, मोहरुन जातांना पाहिलंय मी….

आयुष्यभर साथ देण्याचं ठरलं असतांना
मधेच ती सोडून गेली,
तेव्हा……

गुलमोहराचं पान न पान गळतांना पाहिलंय मी….

 

 

 

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 22 जुलै, 2018

नाईस टू मीट यू


सायंकाळ उलटून गेली होती, अंधार पडायला लागला होता. चंद्रगडाच्या किल्ल्यावर जायचं त्याचं निश्चित झालं होतं. भिल्लाच्या एका वस्तीवर प्रशांत पोहचला. एका भिल्लानं रानातल्या झोपडीत प्रशांतची राहण्याची जुजबी व्यवस्था केली. उघड्यावर झोपण्यापेक्षा बरं म्हणून प्रशांतही खूश झाला होता. शाल अंथरून बॅगेची उशी करुन बराच वेळ प्रशांत लोळत पडला होता. थकल्यामुळे त्याला एक हलकीशी डुलकी लागून गेली होती. डोळे उघडले, बाहेर पाहिलं तर अंधार अंगावर येत होता. दुरवर झोपड्यामधून धपं धपं असा एका तालात भाकरी थापल्याचा आवाज येत होता. कुत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज सुरुच होता. प्रशांतने मोबाईलच्या घड्याळात पाहिलं अकरा वाजून बावन्न मिनिटे झाली होती. रातकिड्यांचा किर्र किर्र आवाजात रात्र भयाण वाटत होती. बॅगेत आणलेली मेणबत्ती शोधावी म्हणून प्रशांत बॅग चाचपू लागला. बॅगेला चाचपतांना प्रशांतच्या हाताला काही तरी गार गार लागल्याने प्रशांत चपापला होता. मनातला पाल आणि सापाचा विचार दूर करुन त्याने मेणबत्ती काढली. आगपेटी काढली आणि काडी ओढणार तितक्यात मोबाईलची रिंग वाजली. नाव पाहिलं आणि प्रशांत गालातल्या गालात हसला. दुसर्‍या टोकाहून लाडीक आवाज आला.

” मला प्रशांतशी बोलायचं आहे”
प्रशांत लटके चिडून म्हणाला ” काही काम असेल तर उद्या फोन करा किंवा पुण्यात आल्यावर भेटा”
”प्लीज प्लीज फोन कट करु नको. मी काय बोलतेय ऐकून तरी घे”

प्रशांतला तिच्याशी बोलायचं होतं आणि नव्हतं सुद्धा. प्रशांतच्या डोक्यातून गेल्या महिन्यात घडलेला प्रसंग काही जात नव्हता. निलूशी त्याचं भांडन झालं होतं. आता आपली ही शेवटची भेट. या नंतर आपण भेटणार नाही. एकमेकांना वचनं देऊन झाली. आणि समजूतदारपणाने त्यांनी एकमेकांपासून वेगळं व्हायचं ठरवलं होतं. नीलूच्या  बहीणीच्या अपघाती मृत्युनंतर नीलूला नाविलाजाने एका वकीलाशी लग्न करावं लागणार होतं. अपघातात तीही जखमी झाल्याचं कळलं होतं.

” बोल, काय बोलायचं आहे” उगाच राग दाखवत प्रशांत म्हणाला.
” उद्या सायंकाळी आपण नागवेलीच्या बागेत भेटतोय. मी एसेमेस करीन बाय” म्हणत निलूने फोन कट केला.

फोनकडे पाहात प्रशांतचं मन एक वेगळ्या भावविश्वात गेलं. आयुष्यात काय काय घडत असतं म्हणून तो विचार करत बसला. बाहेर कुठेतरी पावसाची एक सर घेऊन गेली होती. हवेत गारवा जाणवत होता. मातीचा दरवळही पोहचत होता. आदिवासींच्या आरोग्यसेवेच्या उपक्रमात नीलूची झालेली त्याला पहिली भेट आठवली. आणि मग भेटी नियमित होत गेल्या. दोघांनीही सामाजिक कार्य करायचा निर्णय घेतला. कुटूंबाच्या जवाबदार्‍या आणि सामाजिक उपक्रम यात नाती गोती यापासून दोघेही दूर झाले होते. प्रशांत सर्व आठवणीतून बाहेर पडला. झोपडीच्या तोंडाशी येऊन प्रशांतने दूरवर पाहिलं झोपड्यांमधे मंद उजेड दिसत होता. प्रशांत पुन्हा अंथरुणावर येऊन पडला. पण, तितक्यात खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचा भास झाला. ”छ्या काहीतरीच काय” म्हणून प्रशांतने शाल अंगावर घेतली आणि तो पहुडला.

” प्रशांत, मला वाटलंच होतं तू इथे येणार, आलाच ना ! ”

झोपडीच्या दाराशी बाहेरच्या चांदणप्रकाशात एक अस्पष्ट आकृती प्रशांतला दिसत होती. केस मोकळे सोडलेले, पण ते हळूवार उडत होते. तपकिरी रंगाचे डोळे अंधारात चमकत होते. शरीरावर वस्त्र आहेत की नाही ते अंधारात स्पष्ट दिसत नव्हतं. पायातलं चांदीचं पैंजण मात्र चकाकत होतं. नीलू वाटत नाही पण निलूच वाटावी इतकी ती काळाखोतली आकृती सारखी वाटत होती. बाहेर कुत्र्यांचा भूंकण्याचा आवाज वाढलेला होता. ती काळोखातली आकृती पुढे हात करुन म्हणाली.

” प्रशांत, ये रे बाहेर. अजून खूप वेळ आहे, सकाळ व्हायला. माझं ऐक, प्लीज. ” आवाज निलूचाच होता.
” तुला आवडतात ना मी मोकळे केस सोडलेले, तुला केसात गजरा माळायला आवडतो ना”

प्रशांतची भितीने गाळण उडाली होती. प्रशांतचा ऊर जोरजोरात धपापू लागला. प्रशांत आपल्या परिचित मित्रांच्या नावाने हाका देऊ लागला. आता मात्र झोपडीचं फाटक लावल्याचा आवाजही येऊ लागला. एकाएकी गारेगार वार्‍याची झुळुक प्रशांतच्या अंगावर येऊन गेली. बंद फाटकातून इतका गार वारा यावा याचं प्रशांतला एवढ्या भितीच्या प्रसंगातही आश्चर्य वाटलं. आता ती सुंदर वाटणारी आकृती हिंस्र पशूसारखी दिसायला लागली. आता ती आकृती वेगवेगळे आकार घेऊ लागली. प्रशांत भितीमुळे आलेल्या घामाने चिंब झाला होता. प्रशांतने तितक्याच तत्परतेने उशाशी ठेवलेल्या बॅगेत हात घातला. एक स्तोत्राचं पुस्तक त्याच्या हाती लागलं. जोरजोरात तो ते अष्टक श्लोक म्हणू लागला. घशाला कोरड पडली त्याने पाण्याची बॉटल हातात घेतली होती आणि त्याच बरोबर.

” मी येणार नाही, माझी अजून वेळ झालेली नाही.”
” मी येणार नाही, माझी अजून वेळ झालेली नाही, असे ओरडू लागला.

सकाळी सकाळी आजूबाजूच्या वस्तीवरची लोक आपापल्या कामावर निघालेली होती. एकाने प्रशांतला हाताने हलवून हलवून उठवले.
‘वो, सायब, वो सायब, असं काहून ओरडू राहीले. काय म्हणताय तेबी कळंना”

आजूबाजूची सर्व बाया माणसं प्रशांतला फिदीफिदी हसत होती. सकाळची कोवळी सूर्यकिरणे झोपडीत यायला लागली होती. प्रशांतने डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं आणि तो स्वतःशीच गालातल्या गालात हसायला लागला. मात्र रात्रीचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरुन जात नव्हता. दोन बिसलर्‍या बाटल्यांपैकी एक संपलेली आणि एक मात्र भरलेली दिसत होती. कोणी आणून ठेवल्या होत्या या पाण्याच्या बॉटल, आणि तेव्हाच प्रशांतच्या मोबाईल इनबॉक्समधे निलूचा मेसेज लकाकत होता” गुड मॉर्निंग, नाईस टू मीट यू”

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 2 ऑक्टोबर, 2017

बौद्ध लेणी औरंगाबाद : एक तोंडओळख.

एका रविवारची ही गोष्ट. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचाही कंटाळा आला होता. ऊन तर मी म्हणत होते. कुठे बाहेर जाऊ नये असं बेकार ऊन. सुट्ट्यात पाहुण्यांचा गोतावळा. घर गजबजून गेलेलं. मलाच जरा सुटका हवी होती. मग निघालो आमच्या औरंगाबादच्या लेणीला.

ही वाट लेणी कडे जाते..
बोधीसत्व..

मराठवाड्यात जगप्रसिद्ध अशा लेण्या आहेत, आता त्या माहिती बाबत काही नवीन राहीलं नाही. स्थापत्य आणि शिल्पकलेच्या परमोत्कर्ष वेरुळ येथील कैलास लेणी व अन्य लेणीत दिसून येतो. प्राचीन शिल्प स्थापत्य आणि चित्रकलांचा उत्कर्ष अजिंठा लेणीत बघायला मिळतो. शैलगृह स्थापत्याचा दक्षिणेतील पहिला आणि उत्तम आविष्कार म्हणजे पितळखोरा येथील लेणी. (वल्ली बरोबर जायचं आहे, म्हणून मी तिथे जात नाही) या शिवाय, धाराशीव, खरोसा, आणि आमची औरंगाबादची बौद्ध लेणी. या सर्व लेण्यांनी मराठवाड्याच्याच नव्हे देशाच्या वैभवात भर घातली आहे. आमचा मराठवाडा संतांची भूमी. आमच्या मराठवाड्याला समृद्ध अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, परंपरेचा इतिहास आहे. मराठवाड्याचा शिल्पकलेचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात ”जावे पा वेरुळा जेथे, विश्वकर्मियाने सृष्टी केली” वेरुळची लेणी म्हणजे प्रत्यक्ष विश्वकर्म्याने घडवलेली अद्भूत सृष्टी.
मराठवाड्याच्या या शिल्प स्थापत्य परंपरांचा प्रारंभ इसवी सन पूर्वी पहिल्या शतकात झाला असे म्हणतात. प्रतिष्ठानच्या सातवाहन सत्तेचा उदय झाला आणि शिल्प स्थापत्य कलेला बहर आला. अजिंठ्याचा दगड म्हणजे कठीण खडक. ज्वालामुखी किंवा तत्सम गोष्टींमुळे त्याला एक टणकपणा आलेला तो खडक. बारीक छिद्र असलेल्या या खडकाला. कारागिरांनी घासून चांगला गुळगुळीत केला त्यावर चिखलांचा लेप दिला. अभियंते आणि अभ्यासक त्याला ‘स्टको प्लास्टर’ असे म्हणतात. सांगायची गोष्ट अशी की आमच्या औरंगाबादपासून डोंगरांची रांग सुरु होते, ती रांग थेट वेरुळ आणि पुढेही जाते. वेरुळच्या लेणी अगोदर औरंगाबादची लेणी कारागिरांनी कोरली असावी असे मला वाटते. कारण इथे हा प्रयोग फ़सला आणि कलाकार पुढे डोंगररांगांकडे गेले असावेत असे मला वाटते. (माझ्या म्हनण्याला काहीही आधार नाही) अशाच बौद्ध लेणीची ही गोष्ट.

बोधीसत्व
धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेत बुद्ध

बौद्ध धर्मीय लेण्यांचा कालखंड साधारणपणे पाचशे पन्नास ते सातशे पन्नास समजला जातो. गिरीशिल्प खोदण्याची कल्पना ही बौद्धांचीच असे म्हटल्या जाते. बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी तसेच भिक्षूंना वास्तव्य करण्यासाठी विहार आणि चैत्य रुपाने या लेण्या खोदण्याची प्रथा सुरु झाली. हिंदूंनी आणि जैनांनी त्याचं अनुकरण केलं. अर्थातच इ.स.पूर्व शतकात सुरु झालेली ही गिरीशिल्पांची निर्मिती सुरुवातीच्या काळात अत्यंत प्रागतिक अवस्थेत होती. मुळातच हीनयात काळात बौद्धधर्मप्रसाराचे तंत्र मूर्तीपूजनाच्या पलीकडील होते. केवळ प्रतिकात्मक गोष्टींचा उपयोग करुनच धर्मप्रसाराची दिशा ठरवली जात असे. त्यामुळे लेण्यामधील शिल्पकधा तशी साधीसूधीच आहे.
औरंगाबादला पोहचलात की बीबीका मकबरा, पाणचक्की, ऐतिहासिक दरवाजे पाहून झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अगदी जवळ असलेल्या ही बौद्ध लेणी. लेणीच्या पायथ्याशी आपल्या माता-पित्याच्या स्मरणार्थ अनेकांनी गौतमबुद्धांच्या धातूतील मूर्त्या लावलेल्या दिसून येतात. शंभर एक पाय-या चढून गेलात की तिकिट घर लागते. दहा रुपये देऊन तुम्हाला लेणीकडे जाण्यासाठी प्रवेश मिळतो. या डोंगररांगावर ऐकून पाच लेण्या आहेत.

सुरुवातीची लेणी आकारमान व शिल्पकला यांच्या दृष्टीने हे लेणी मनात भरणारी नाही. भिक्कूंच्या निवासस्थानासाठी ही जागा वापरली जात असावी. या लेणीची गंमत अशी सांगितल्या जाते की भगवान बुद्धाला पार्श्वनाथ किंवा महावीर समजून काही जैनमुनींनी लेणीचा ताबा घेतला होता व तो पुढे सोडलाही होता. (संदर्भ नाही) लेण्यांची शैली पहिल्या शतकातील व मथुरा शैली अथवा गांधार शैलीमधे मोडत असावी. अजिंठा लेण्यातील बहुतेक प्रतिमा या धम्मचक्रप्रवर्तनमुद्रेमधे हात असलेले आहेत आणि इथेही तशाच प्रतिमा आहेत तेव्हा लेणींचा काळ सारखा असावा असे वाटायला लागते.

ध्यानमुद्रेतील बुद्ध
बहुधा बोधीसत्व आणि मद्दी (विश्वंतर जातक)

लेणी क्रमांक चार. चैत्यगृह आणि स्तूप. एक साधे शिल्प आहे . सामुदायिक पुजेअर्चेसाठी ही जागा वापरली जात असावी. समोरचा भाग नष्ट झालेला दिसतो. छत कमानदार असून अष्टकोणी खांबावर आधारलेला आहे. स्तूपावर कोणत्याही प्रकारचे कोरीव काम नाही. सूर्याची किरणे सरळ या स्तूपावर पडावीत अशा पद्धतीने त्याची रचना केलेली दिसते, मात्र याच उद्देश्यानं हा स्तूप केला असावा असे म्हणायला काहीही आधार नाही.

लेणी क्रमांक तीन हे एक विहार असून पहिल्या आणि दुसर्‍या लेण्यातील विहारापेक्षा याचे स्वरूप जरा वेगळे आहे. आतील प्रत्येक खांबावर कोरीव काम केलेले दिसून येते. छताच्या वरच्या बाजूला पाने, फुले कोरलेली दिसतात त्या खाली उभ्या असलेल्या शालभंजिका कोरल्या आहेत. पत्येक खांबावर चक्रकार पट्टे कोरले असून त्यात सुंदर गुलाब पुष्पांचे कोरीव काम आहे. जवळ जवळ बारा खांब आहेत. वंदनागृहाच्या गाभार्‍यात भगवान बुद्धाची भव्य प्रतिमा खाली पाय सोडून धम्मचक्रप्रवर्तनमुद्रेत आहेत. एकाबाजूला सात पुरुष उपासिका आणि एका बाजूला सहा स्त्री उपासिका आराधनेसाठी बसलेल्या दिसतात. स्त्रीयांच्या अंगावर विविध अलंकार हातात पुष्पमाळा दिसतात. याच लेणीतील पट्टुयांवर युद्धाचे दृष्य कोरलेले दिसून येते. तिथेच भगवान बुद्ध कोचावर पहुडलेले दिसून येतात. हीच लेणी या लेण्यांचा आत्मा आहे.

स्तंभ
धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्ध

लेणीक्रमांक दोन. हा एक विहार असून यात भिक्कूंना राहण्यासाठी आजूबाजूला खोल्या नाहीत. हे चैत्य नेहमीप्रमाणे नाही. हिंदू मंदिराप्रमाणे त्याची अनुकरण केल्यासारखे वाटते. विहार भव्य आहे. अंतगृहही विशाल आहे. प्रवेशद्वार मोठे आकर्षक आहे. प्रवेशद्वारी दोन्ही बाजूला कमळपुष्प घेतलेले दोन उंच द्वारपाल आहेत. त्यापैकी एक विद्याधर आणि एकाच्या मस्तकावर पाच फणे असलेला नाग आहे. विहाराच्या गाभार्‍यातील मुख्य प्रतिमा भगवान बुद्धाची आहे. खांबाच्या वरच्या बाजूला गंधर्व असून जवळच चामरधारकही आहेत. भगवान बुद्धाच्या प्रतिमेकडे आदरपूर्वक पाहत असलेले काही उपासक आणि उपासिका दिसतात.

लेणीक्रमांक एक हाही एक मोठा विहार आहे. दरवाजा खिडक्या असलेले अंतगृह आहे. त्यावरील कोरीवकाम अतिशय सुंदर आहे. पडवीत खांब आहेत. खांबावर नक्षीकाम केलेले दिसून येते. छताचे वजन पेलण्यासाठी उभ्या केलेल्यां खांबांवर सुंदर स्त्री शिल्पे आहेत. वस्त्र, अलंकार त्या काळातील वेशभूषांचे आणि अलंकाराचे उत्कृष्ट दर्शन घडवितात. कलाकुसर अत्यंत मनोहर आहे. प्रवेश द्वाराची चौकट नक्षीकामाने मढवून काढलेली आहेत. विहाराच्या पश्चिम बाजूला खिडकी दरवाजांच्यामधे कमलासानावर भगवान बुद्धाची प्रतिमा विराजमान असून त्यांच्या बाजूला चामरधारी सेवक आहेत. त्यांचे सिंहासन पाच फणे असलेल्या नागराजाने स्वतःच्या डोक्यावर धारण केले आहे. याच भिंतीच्या पडवीत डाव्या भागात भगवान बुद्धांच्या सात आकृती ओळीने कोरलेल्या आहेत. त्यांच्या बाजूलाच दोन बोधिसत्वाची सुंदर शिल्प आहेत. लेण्यांच्या एका भिंतीवर कोरण्यात आलेली एक सुंदर मत्स्याकृतीही आहे.

नंद उपनंद नाग अनुयायींसह बुद्धमूर्ती
उपासकांसाठीच्या खोल्या

लेण्यांमधे खूप शिल्प नाहीत. पडवीत मात्र खूप शिल्प आहेत. उजेडाची कोणतीही सोय नसल्यामुळे फोटो काढणे कठीण जाते. बाकीच्या तीन लेण्या या लेण्यांच्या विरुद्ध बाजूला आहेत. काही दोन एकशे पाय-या चढून गेलात की एक मोठी दगडी कपार लागते. सुरुवातीलाच एक क्रमांकाच्या लेणी म्हणून जी आहे तिथे दोन शयनकक्ष आहेत. दुसरी लेणी म्हणून जे आहे ते चैत्यगृह आहे. आणि आत स्तूप आहे. तिस-या आणि चौथ्या लेणीत गौतमबुद्धांचे विविध शिल्प कोरलेले दिसून येतात. पाचव्या लेणीत खांब आणि काही गौतमबुद्धांची शिल्प आहेत. प्रामुख्याने खांबांवर नक्षीकाम अधिक दिसून येते तर जागोजागी गौतम बुद्धांची शिल्प दिसतात म्हणूनच या लेणीला दिलेलं बुद्ध लेणी हे नाव सार्थ ठरतं.

अवलोकितेश्वर पद्मपाणी
चैत्यगृह

सायंकाळी मी चार वाजता लेणी बघण्यासाठी गेलो होतो. अंधार पडल्यावर लेणी उतरु लागलो. आणि इतिहासाच्या आठवणी ढवळून निघाल्या. देवगिरीचा यादव सम्राट ज्याने कलाकारांना राजाश्रय दिला. चालूक्य कला परंपरांची आठवण झाली. यादव शैलीने स्वत:चा एक ठसा उमटवला होता. मंदिरं असो, लेण्या असो, मराठवाड्याची कला दिमाखाने आजही मिरवत आहे, विद्यापीठाच्या जवळ असलेल्या या बौद्ध लेणीनेही वैभवात भरच घातली आहे. गौतम बुद्धांच्या विविध प्रतिमा आणि वेगवेगळी शिल्प इथे आहेत. पण, इथे लागतो उत्तम छायाचित्रे काढणारा आणि इतिहास माहिती असणारा माणूस. (वल्लीसारखाच) विद्यापीठाजवळील पहिल्या पाच लेण्यांची तोंडओळख आपण पाहिली. बाकीच्या चार लेण्यांची माहिती पुढील भागात…. पहिल्या गटाच्या पूर्वेला दुसर्‍या गटापर्यंत जाण्यास त्याच डोंगररांगामधून मार्ग आहे. क्रमांक सहापासून नऊपर्यंत जी लेणी आहे, ती दुसर्‍या गटात मोडते. पहिल्या लेण्यांपेक्षा हा भाग जरा उंचीवर आहे. दुसर्‍या गटातील नववे लेणे सर्वात मोठे आहे. लवकरच लिहितो….!

वज्रपाणी
बोधीसत्व —-> शलभंजिका

एकेक शिल्प आणि त्यांची ओळख वाट्सपवर करुन दिल्याबद्दल….. वल्लीचे उर्फ प्रचेतसचे मनःपूर्वक आभार. मी लेणी बघत होतो आणि वाट्सपवर हे कशाचं शिल्प, ते कशाचं शिल्प असं विचारत होतो, त्यांच्याच कटकटीमुळे हे लेखन करावं लागलं. थँक्स रे मित्रा.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 2 ऑक्टोबर, 2017

सैराट : एक दाहक वास्तव.

सैराट चित्रपटाबद्दल खुप लिहिल्या गेलं, बोलल्या गेलं, वाट्सपवर हमरीतुमरीवर येईपर्यंत चर्चा झाल्या. मिपावरही चर्चा रंगली आहेच, ही माझी अजून एक भर.

नागराज पोपटरव मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट प्रदर्शीत झाला आणि प्रदर्शनापूर्वीच सैराट या मराठी चित्रपटाची चर्चा खुप झाली. आणि चित्रपट प्रदर्शनानंतरही सैराट या चित्रपटाची विविध माध्यमातून अधिक उणेची चर्चा अजूनही विविध पैलूंसह सुरुच आहे, असे दिसते. नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाची चर्चा खुप झाली, एक वेगळा चित्रपट म्हणुन अनेक प्रसार माध्यमांनी दखल घेतलेली होती . सैराट चित्रपटानेही ६६ व्या बर्लीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नाव केल्याचे वाचनात आले. प्रसिद्ध नसलेल्या सामान्य कलाका्रांना सोबत घेऊन, एक वेगळा अनुभव, एक वेगळा विषय कलात्मक पद्धतीने चित्रपटाच्या माध्यमातून सादर करण्याची परंपरा नागराज मंजुळे यांनी सैराट मधून कायम ठेवल्याचे दिसून येते.

index

सैराट, ही तशी एक ग्रामीण करमाळ्याच्या भागात घडत असलेली परश्या (आकाश ठोसर) आणि अर्चना (रिंकु राजगुरु) यांची सरळ साधी प्रेमकथा. कोणी कोणाची जात पाहुन, कोणी कोणाला आवडत नसते, प्रेमात ही अटच नसते. प्रेमाची स्वत:ची एक भाषा आणि प्रेमात स्वत:च एक जगणं असतं. गावगाड्यातील विषम व्यवस्थेतील जातीच्या उतरंडीतून अशी जेव्हा कथा घडत जाते, तेव्हा ती कथा जरा प्रेक्षकांच्या मनात तळाशी खोल जाते. सैराटा चित्रपटाची प्रेमकथा अगदी हिंदी, मराठी चित्रपटातल्या प्रेम कथेप्रमाणेच याही चित्रपटातच रुटीन वळणावरुनच जाते. वरीष्ठ महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणा-या तरुण तरुणीची ही प्रेमकथा. महाविद्यालयीन जीवन जगणा-यांना आणि जगून गेलेल्यांना आणि चित्रपटातील विविध प्रसंगातून हे नेहमीच पाहिलेलं असल्यामुळे प्रेम प्रसंगाचं काही नाविन्य वाटणार नाही. गावातील प्रतिष्ठीत पाटलाची मुलगी जी अतिशय धीट स्वभावाची, कोणाचीही भीड न ठेवणारी अशी आहे, गावात पाटलांची खूप दहशत आहे, हे विविध प्रसंगातून मंजुळे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त केलं आहे. परशा हा कोळ्याचं पोर, सोबतीला जीव लावणारे लंगड्या, आणि सल्ल्या हे मित्र. परशाला आर्ची आवडते. दोघांचेही स्वभाव वेगवेगळे. असं हे लपून छपून चाललेलं प्रेम पाटलाच्या घरी कळतं. आणि मग पुढे प्रचंड मारहाण, गावात त्यांची असलेली दहशत, प्रिन्सचा वाढदिवस, शिक्षकाला मारलेला फटका, अशी सरंजामशाहीची प्रतिकं चित्रपटातून अनेकदा ठळकपणे येऊन जातात. संस्थाचालकांनी चालविलेल्या महाविद्यालयातून शिक्षकांना काय काय करावं लागतं एक ओझरता प्रसंगं अतिशय सुंदर आलेला दिसतो. परशाच्या घरच्यांनी गाव सोडून जावं म्हणुन आणलेला दबाव, प्रिन्सच दहशत, या गोष्टी असल्या तरी पूर्वार्धात प्रेमकथा अनेक लहान मोठ्या प्रसंगानी उत्तम फुलवली आहे. खुसखुशीत, गालातल्या गालात हसवणारे, आणि प्रसंगी मोकळेपणाने हसवणारे प्रसंग आहेत. प्रेमवीवर कोणाला भीत नसतात. पाटलांच्या समर्थकांकडून मार खाऊन हे प्रेमवीर थांबत नाही. गाव सोडून पळून जातात. , गावगाड्यातील बारव, त्यातील पोहणे, शेती, याचं अतिशय सुंदर छायाचित्रण डोळ्यांना मोहवून टाकतात.

हैदराबादला पळुन गेल्यावर दोघांचा संसार फुलतो. इथे चित्रपट संथ झाल्यासारखा वाट्तो. पूर्वार्धात असलेला खुसखुशीतपणा विनोद, ते संवाद हरवलेले असतात. मान, सन्मान, समाजातील प्रतिष्ठा, अपमान, पाटलांना सतत बोचत जाते. आणि मग चित्रपट्गृह अगदी शांत होऊन जातं, हा प्रसंग उत्तम उतरला आहे. चित्रपट योग्य जागी संपला. पार्श्वसंगीत उत्तम आहेच, गाणीही तशी लोकप्रिय झाली आहेत. अर्चना उर्फ रिंकु राजगुरुचा लाजवाब अभिनय, बोलण्याची लकब, भाव मारुन जाते. आकाश ठोसरही दिसायला चांगला आहे, लंगडा प्रदीप, सल्ल्या, पाटील, मंग्या, (नावं माहिती नाहीत) यांचा अभिनयही झकास आहे, एकुण काय एकवेळा चित्रपट बघायला हरकत नाही.

मानव जातीच्या इतिहासाचा विचार केला की जातीच्या उच्च आणि कनिष्ठ जातीचा लढा नवा नाही. प्रत्येक जातीच्या माणसानं आपापल्या पायरीनं राहावं, या सांस्कृतिक वारशांची मोडतोड प्रेम, जमीन, गावातील राजकारण, प्रतिष्ठा, आणि अनेक कारणांनी झालेली दिसून येते. विविध जात पंचायती, त्यांचे नियम, त्यांची दहशत, अनेकदा वर्तमानपत्रातून वाचायला मिळते. माणसं शिकली आणि जात अजून घट्ट रुतून बसली. आपापल्या अस्मिता, प्रतिष्ठा, पणाला लागलेल्या दिसून येतात. सैराट चित्रपट समाजातील वास्तवच अधोरेखित करतो. जातीव्यवस्थेला जसा धर्माचा आ्धार देऊन जशी विविध बंधने लादल्या गेली तशी ही बाकीची उतरंड परावलंबी आणि पंगू झालेली दिसते. आता काळ बदलून गेला आहे, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नती या गोष्टीमुळे आता जातीय विषमता वरवर कमी झाली तर आत तितकीच घट्ट आणि धुसफुसत आहे, असेच चित्रपट पाहिल्यानंतर म्हणावे लागते. चित्रपट आवडलाच हे वेगळे सांगणे न लगे.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 24 एप्रिल, 2015

समतेचा संदेश देणारं नाटक : कोण म्हणतं टक्का दिला ?

कला शाखेच्या पदवीच्या वर्गाला अभ्यासक्रमात असलेल्या नाटकावर खूप दिवसापासून लिहायचं ठरलं होतं. अभ्यासक्रम बदलला पण लिहिणं काही होत नव्हतं. आज नाटकावर लिहिलंच पाहिजे असं वाटलं म्हणून कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाचा हा परिचय.

कोण म्हणतं टक्का दिला ? हे लेखक संजय पवार यांचं नाटक. दलित नाट्यक्षेत्रात न आलेला एक वेगळा विषय नाटककार, दिग्दर्शक संजय पवार यांनी हाताळला आहे. नाटकाचे मूळ उद्दिष्ट समाजातील विषमता समोर आणून समतेचे बीज रोवले जावे. आणि म्हणूनच हे नाटक वेगळे ठरते.

नाटकाच्या पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात लेखकाने देव आणि राक्षस यांच्या मनोभूमीतून काही पात्रे रंगविली आहेत. देवलोक म्हणजे उच्च वर्णीय आणि राक्षस लोक म्हणजे दलित समाज असे लेखकाला सांगायचे आहे. दानवांचे गुरु शुक्राचार्य आणि देवांचा राजा बृहस्पती या दोघांच्या नीतीमधून नाटकाचा पहिला प्रवेश सुरू होतो. शुक्राचार्यांना संजीवनी विद्या प्राप्त झालेली असते आणि ते मृतांना जिवंत करू शकतात. शुक्राचार्याची मुलगी देवयानी आणि बृहस्पतीचा मुलगा कच यांच्यातील प्रेमामुळे संघर्षाची ठिणगी पडते.

कच हा देवाचा म्हणजेच देव लोकांचा पुत्र आणि आपला शत्रू असूनही केवळ देवयानीच्या त्याच्यावरील प्रेमामुळे दानवाचे गुरु शुक्राचार्य आपल्या मुलीच्या प्रेमाखातर युद्धात मृत झालेल्या कचाला पुन्हा जिवंत करतात मात्र जिवंत झाल्यावर कच हा देवयानीसोबत विवाहाला तयार नसतो तो देवयानीसोबत विवाहाला नकार देतो संतप्त झालेली देवयानी कचाला शाप देते ती म्हणते, ”दानवाच्या पोरा ! राक्षसांच्या भावनांशी खेळणारा तू विसाव्या शतकाच्या अखेरीस, भूतलावर मागास वर्गात जन्म घेशील आणि कायद्याने तुला सवर्णात वाढावे लागेल आणि तेव्हा तुला या संजीवनीचा मोह धरल्याचा पश्चात्ताप होईल” आणि नाटकाचा पहिला प्रवेश संपतो.

नाटकाचा दुसरा प्रवेश हा आधुनिक काळातला म्हणजेच विसाव्या शतकातला आहे. देवयानीने दिलेला शाप, देव आणि दानव अशी नाटकाच्या सुरुवातीची उभी केलेली पार्श्वभूमी पुढे संपूर्ण नाटकाला कलाटणी देते. कमलाकर आराध्ये यांचं एक सुखवस्तू कुटुंब, त्यांच्या पत्नी विमलाबाई आराध्ये, मुलगी सुकन्या, मुलगा सुदर्शन . असा हा परिवार. कमलाकर आराध्ये यांचा छोटासा व्यवसाय आहे. विमलाबाई गृहिणी, आणि महिला मंडळाच्या कामात सतत व्यस्त असतात. मुलगी सुकन्या नव्या विचारांची तर मुलगा सुदर्शन हा मात्र जुन्या विचारांचा असे हे सुखी कुटुंब.

अशा या सुखी कुटुंबात शासनाचं एक पत्र येतं आणि नाटकातील मुख्य विषय सुरू होतो. भारत सरकारने एक अध्यादेश काढलेला असतो आणि त्यात असं नमूद केलेलं असतं की,” नवीन घटनात्मक तरतुदीनुसार पुढील महिन्यापासून केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या राखीव जागा खास अध्यादेशानुसार रद्द ठरविल्या आहेत गेली पन्नास वर्ष चालू असलेल्या सवलतीमुळे राष्ट्र आता वर्णवर्गविरहित झाले असल्याचे केंद्र शासनाची खात्री आहे परंतु अजूनही संपूर्ण एकात्मता साधण्यासाठी शासनाने काही नवी पावले उचलेली असून त्यातले हे एक पाऊल आहे. दुसरे पाऊल असे आहे की या एकात्म समाजाचे सर्व जगाला दर्शन घडावे म्हणून नव्या कायद्यानुसार प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय स्त्री अथवा पुरुष सामाजिक समतेचा भाग म्हणून कायद्याने ठेवावा लागेल. असा मागासवर्गीय आपल्या कुटुंबात घेतल्याशिवाय रेशनकार्ड, गॅस, लायसन्स, पासपोर्ट इत्यादी बाबी देण्यात येणार नाहीत. सबब अशा कुटुंबानी व मागासवर्गीयांनी त्या संदर्भात योग्य ती कागदपत्रे जवळच्या समता अधिका-यांकडे जमा करावीत. समता विनिमय केंद्रावर उच्चवर्णीय आणि मागासवर्गीय याच्या स्वतंत्र याद्या लावलेल्या असून, त्यातून आपल्या पसंतीचे सवर्ण व मागासवर्गीय निवडता येतील. त्यातूनही निवड न होऊ शकल्यास शासन देईल ती निवड मान्य करावी लागेल. ही समता विनिमय योजना प्रथम दहा वर्षाकरिता राबविण्यात येईल”

सरकारने काढलेल्या या अध्यादेशामुळे आराध्ये कुटुंबात ‘कच-या धिवार’ नावाचा मागासवर्गीय राहायला येतो. कमलाकर आराध्ये आणि सुकन्या पुरोगामी विचारांचे असल्यामुळे त्या तरुणाला स्वीकारतात विमलबाई आणि सुदर्शन यांना मात्र या गोष्टीचा राग येत असतो. सुदर्शनचे आणि कच-याचे जातीवरुन, संस्कृतीवरुन नेहमीच खटके उडत असतात दरम्यान सुदर्शन न्यायालयात या आदेशाविरुद्ध दावा दाखल करतो.

आराध्य कुटुंबात कच-या चांगला मिसळतो. सुकन्या आणि त्याच्या मैत्रीचे सुर जुळतात त्या दोघात प्रेमाचे संबंध उभे राहतात. पुढे काय काय होतं ते नाटक वाचतांना मजा येते. मी मात्र नाटकाच्या शेवटाकडे येतो. कच-याचं शेवटचं स्वगत मला खुप आवडतं.-

”तू ऐकते आहेस ना देवयानी ? तुझ्या खेळांचा-शापाचा शेवट आलाय . संजीवनीच्या शोधात मी राक्षसाच्या पोटात शिरलो. तिथून तू मला इथल्या राक्षसांच्या पोटात ढकलंलस आणि इथल्या देवांच्या हातात दिलास हा माझा राक्षही देह. हे देव दानव जन्माचं शापित कडं भेदून मी आता जन्माला घालणार आहे माणूस ज्याला फ़क्त माणूस माहिती असेल. जो देवांच्या नावावर राक्षस होणार नाही की, राक्षसांच्या नावावर देव होऊन मिरवणार नाही. हे माणूसपण खूप छान आहे देवयानी. याला अमरत्वाची हाव नाही. देवपणास वाव नाही. चोरी लबाडी न करता, छान जगता येतं आणि सुखानं मरता येतं. इथं संजीवनीसाठी युद्ध नाही. मी तुझा आभारी आहे देवयानी. तुझ्या माणसांना मला दाखवता आले, देव दानवांचे रुसवे फ़ुगवे आणि अंधश्रद्धेचे बुडबुडे. मी त्यांना सांगू शकलो, राक्षसातले अमानवीपण आणि देवत्वातला फोलपणा. मी सुकनेच्या पोटी जोजवेन माणूस, ज्याच्यावर जातिधर्माचे अक्षांश-रेखांश नाही, माणुसकीचा अटळ धृव आणि माणूसपणाचे विषवृत्त असा हा आगळाच भूगोल वाढवेन सुकन्याच्या पोटी ”

आधुनिक काळातही अजूनही स्पृश्य-अस्पृश्य कसं दडलेलं असतं त्याचं उत्तम चित्रण या नाटकातून येतं. नाटकाची भाषा अगदी सहज आणि संवाद अगदी खुशखुशीत असल्याने नाटक केव्हाच वाचून संपवून जाते. उरतो तो फक्त प्रश्न मनात की असं होऊ शकतं ? असं करता येईल ? सामाजिक समतेचा असा प्रयोग राबविता येईल ? की केवळ मागच्या पानावरून पुढे जायचं काहीच न करता ? अशा असंख्य प्रश्नासहित हे नाटक एकदा वाचलंच पाहिजे.

कोण म्हणतं टक्का दिला. (दुवा बुकगंगा)

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 29 मे, 2014

रुमानी


देवांचे देव्हारे नेहमीच गच्च असतात
अन तुझा हट्ट दूरवर वसलेल्या सिद्धेश्वराचा.
दुर वळणावळणाच्या रस्त्यावर वाहत जातो
मीच माझ्या गाण्याबरोबर थोडा उथळ होतो.
सिद्धेश्वरही तस तसा उदास  होत जातो.

भर दिवसा मला आभाळ भरलेले नसतांना
वीजा चमकल्याचा अन् गडगडाटांचा भास होतो,
कोणताच आवाज पोहचत नाही तुला

काठावर स्पर्श करुन परत फिरणारी तू
समुद्रलाटेसारखी  धडकत असते मला.

सृष्टीतले  चैतन्य समजून घेतांना
पा-याचा तो पारदेश्वरही समजून  घ्यावा लागतो.
एकाच खोडात वाढेला पिंपळ-लिंब अन
कुमारिकेचा भयान चेहरा मंत्र-तंत्र पुजा.

रुईच्या रोपट्याशी तिचा विवाह पाहतांना.
माणसाचा जन्म असा कसा गं कोणत्या श्रद्धेचा
स्वतःचे  सर्व अस्तित्व  विसरलेला..?

अन सखे,
माझा जीव हल्ली लागत नाही गं तिथे,
अघोरीपणाने ओढले जातोय जरासे रुमानी होतांना.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 26 फेब्रुवारी, 2014

फ़्यंड्री..!!!

राम राम मंडळी. मंडळी, मिपावर फ़्यांड्रीबद्दल उत्तम लिहून आल्यानंतर आणि इतरही ठिकाणी फ़्यांड्रीवर येता जाता चर्चा व्हायला लागल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सूकता लागली होती. मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. पारंपरिक चित्रपटापेक्षा काही तरी वेगळे मराठी चित्रपटातून यायला लागले आहे. वास्तवतेवर आधारित सकस कथा, ध्वनी, छायाचित्रण,कलाकार, या आणि विविध अशा बदलांनी मराठी चित्रपट जरा हटके यायला लागले आहेत. मराठी चित्रपटांना विषय फुलवता यायला लागले थेटरात शांतपणे चित्रपट बघायला जावे, इथपर्यंत मराठी चित्रपटांनी भरारी घेतली आहे, असे वाटायला लागले आहे. असाच एक चित्रपट म्हणजे फ़्यांड्री.

सामाजिक, धार्मिक, व सांस्कृतिक परंपरेच्या अशा अंधार कोठडीत गुदमरलेले दलित जीवन वर्षानुवर्ष बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्क असतांनाही सामाजिक रुढी परंपरेत गुरफटून गेलेल्या कचरु माने (किशोर कदम) आणि त्याचा मुलगा जाबुवंतराव कचरु माने (सोमनाथ अवघडे) यांची आयुष्यातील स्वप्न, व्यवस्था आणि संघर्षाची चित्तर कथा म्हणजे फ़्यांड्री. परंपरा म्हणजे कचरु माने तर बंड म्हणजे जाबुवंतराव माने. गावकुसाबाहेरच्या समाजालाही माणूस म्हणू काही भावना असतात आणि त्याचं इतरांना काही घेणं देणं नसतं. असं एक उत्तम चित्रण फ़्यांड्रीत आपल्याला बघायला मिळते.

कैकाडी समाजातील कुटुंबाची ही कथा. माणसाच्या मनातील न्यूनगंड आणि स्वप्न यांचा हा संघर्ष. प्रेमकथा तशी ती नाहीच. कैकाडी समाजाचे टोपले विणणे हे काम परंतु गावाबाहेर वावरणारा आणि गावातील सर्व हलकी कामं करणारा अशा कुटुंबाचे चित्रण नागराज मंजुळे यांनी केले आहे. शाळेची, अभ्यासाची आवड असलेला, शाळेतल्या ‘शालू’ (राजेश्वरी खरात) नामक पोरीवर एकतर्फी प्रेम करणारा. गावातल्या अशा हलक्या पोरांना उच्चवर्णीय शालू कडे पाहूही नये म्हणून समाजाने घेतलेली काळजी. आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला मोहवून टाकायचे असेल तर काळीचिमणी जाळून त्याची राख डोक्यावर टाकली तर व्यक्ती मोहात पडते अशा श्रद्धेने या गायरानातून त्या गायरानात काळीचिमणीच्या शोधात फिरणारा ’जब-या’ ताकदीनिशी आला आहे.

आपण हलके आहोत आणि आपण आपल्या पायरीने राहीलं पाहिजे कचरू मानेला (किशोर कदम) कळते पण पोराला नाही. गावातील डूकरे गावाबाहेर काढण्याचं काम करावं लागणा-या या कुटूंबाला शिवाशीव आणि भेदाभेद याचा सामना कसा करावा लागतो ते लहान सहान प्रसंगात उत्तम उतरली आहे. कचरु मानेची एक मुलगी लग्न होऊनही घरात पडून आहे तर दुसरीचा विवाह ऐपत नसतांनाही हुंडा देऊन करायचा आहे.

आपण जे समाजाच्या दृष्टीने हलके काम करतो ते आपल्या आवड्णा-या अल्लड प्रेमातल्या प्रेयसीला कळू नये म्हणून काम न करणा-या जब-या. गावासमोर आणि शालू समोर डुकरं पकडायला लावण्याचा प्रसंग. हागणदारीचं चित्रण, हागणदारीत डुकरं पकडण्याचा फोटो काढून फ़ेसबूकवर अपलोड करणे, एका व्यवस्थेला दुस-या व्यवस्थेशी अजिबात घेणं देणं नसणे, डुक्कर शिवलं म्हणून स्नान करणारे कुटुंब. अघोरी कृत्याने यश मिळवायचा प्रयत्न करणारा गावकरी. असे सर्वच चित्रण उत्तम झाले आहे. देवाच्या जत्रेत कानठळ्या बसवणा-या वाद्याच्या मिरवणूकीत उच्च वर्णीयांचा जब-या आणि त्याच्या मित्राला होणारा धुसमुसळेपणा अतिशय सुरेख चित्रपटातून आला आहे.

दलित जीवन किंवा गावकुसाबाहेरचे जीवन म्हणून जगणा-या कचरु मानेला अनेक कटू जीवघेणे अनुभव घ्यावे लागतात.

पराकोटीचा सहनशील,सोशीक, शांत व कष्टाळू आणि पिचलेले मन आपल्याला समजू लागते. अनुभवांना सामोरे जायचे परंतु संघर्ष करायचा नाही. जातीच्या दु:खाला कारण असलेल्या सामाजिक परिस्थितीविरुद्ध तो विद्रोह करुन उठत नाही. व्यवस्थेने त्याच्या माणसापेक्षा त्याच्या जातीला प्रतिष्ठा दिल्याचे दिसते. सतत टोमने, अन्याय, सतत पडतील कामे करणे, परंतु लादलेल्या जीवनाबद्दल चिडून आगपाखड नाही.

जब-याला शालू मिळते का ? वाटेल ते बोलणा-या आणि वागविणा-या समाजव्यवस्थेविरुद्ध जब-या उभा राहतो का हे पाहण्यासाठी चित्रपट नक्की पाहा.

आता चित्रपटात सर्वच उत्तम आहे असं नाही. चित्रपटाची सुरुवात संथ अशी आहे, एखादी डॉक्युमेंट्री भासावी असे स्वरुप सुरुवातीपासून वाटत राहते. आणि चित्रपटाच्या शेवटी ’वळू ’ या चित्रपटाची आठवण व्हावी इतका तो ‘पकडा पकडीसाठी’ वेळ गेलाय असे वाटते. किशोर कदमाचा अभिनय का कुणास ठाऊक फ़ारसा पोहचत नाही. कदाचित सौमित्र म्हणून की एकसुरी अभिनयामुळे ते समजत नाही. चित्रपट योग्य ठिकाणी संपलाय का ? असा प्रश्न निश्चित आपल्या मनासमोर उभा राहतो. प्रेक्षकांच्या अभिरुचीच्या उंचीने चित्रपटाचा आस्वाद घ्यावा, असे म्हणून निर्मात्याने शेवट प्रेक्षकांवर सोडला आहे.

व्यक्तिगत हा चित्रपट मला फारसा का आवडत नाहीहे कोणास ठाऊक. दलित साहित्यात सतत अशा आशयाचं लेखन चाळल्यामुळे म्हणा किंवा उचल्या, उपरा वाचल्यामुळे म्हणा. चित्रपट मला थेट भिडत नाही. किशोर कदम, छाया कदम, सोमनाथ अवघडे, राजेश्वरी खरात, सुरज पवार, आणि इतर अभिनेत्यांनी एक चांगला अभिनयही केला आहे यात काही वाद नाही. आपल्याला हा चित्रपट का आवडतोय जरा तपशिलवार चर्चा व्हावी म्हणून हा पुन्हा प्रपंच….!!!
(छायाचित्र आंतरजालावरुन साभार)

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 17 फेब्रुवारी, 2014

माझ्या सुखासाठी तुला….वणव्यात कसा धाडू मी

‘माझ्या सूखासाठी सखे तुला वणव्यात कसा धाडू मी’ मला अजिंठा काव्यसंग्रहातील ओळी आठवतात. तू वेगळी तुझी माणसं वेगळी, तरीही येतेच तू भेटण्यासाठी. मी तूला पाहतो प्रभातवेळी दरवळणा-या पाखरांच्या गाण्यात. दुपारच्या वेळी भूरभूरणा-या वा-याबरोबरही पाहतो ’तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकूरे’ अशा स्वरातील सुगंध  पोहोचतो दरवेळी माझ्या मनात. आणि मग मी हरवून बसतो माझा मलाच. तुला पाहतांना.  कोणतेही वास्तव भास मला जागे करत नाहीत. जाणीवेची फुले उमलायला लागतात. तुझं खळखळून हसण्याचं चांदणं मी पिऊन टाकतो. तुझं नितळ गाणं खोल रुतून बसायला लागते. उंच टेकडीवरून बघतो  आपण शहराकडे मी रुतलेला तूही रुतलेली. बस क्षण गोठून गेले पाहिजेत असं वाटायला लागतं

एखादा दिवस आणि तीही डिसेंबरातली सायंकाळ. मंदिराच्या परिसरात तू आणि मी आपल्याच नादात. मंदिरात किती ती शांतता असते. भजनाचे हलके सूर तेव्हाच तुझ्या माझ्या गप्पांना पूर. पु.शि.रेगे म्हणतात ‘तशी झाडं पानात यायला लागतात’ आकाशाच्या खिडक्या मिटायला सुरुवात होते’ तु चाफ्याची फुलं ठेवतेस माझ्या हातात. थंडीतला तुझा उबदार स्पर्श. दूर झाडीतून एक थंड हवेची झुळुक हलकेच तुझ्या माझ्यातून वाहात जाते, ‘किती थंड असतो रे तुझा तळहात’ अंगावर सांडलेली ऊब मला काहीच सूचू देत नाही. तु हलकेच अंगावरुन मोरपिस फिरवावा तशी हलके हलके बोलत असतेस. मी निरखत असतो तुला.. ‘वा-याच्या बोटांनी तुझ्या चेह-याच्या तळाशी गेलेली पाने भराभर उलगडून पाहतो, . तु मला मी तूला वाचत असतो. सर्वांगातून लहरत जातो आपण. मंदिरात आता शांतता ‘आता निघलं पाहिजे’ थंडीत तुला काहीही सुचतं जातं.  मनातल्या घुमटात आवाज घुमत जातो.  मी हसतो तुला. चल, आता निघलं पाहिजे. एकमेकांचे हात एकमेकांच्या हातातून सुटत नाही. तीच ओढ, तीच हुरहुर, निरोप घेतांना डोळ्यात दाटलेलं आभाळ आपण दिसू देत नाही, दूरपर्यंत जातांना पाहात राहतो मी तुला आणि माझं एकेक पाऊल तुझ्याभोवतीच रेंगाळत चालते डिसेंबरातली एका सायंकाळ आणि मग म्हणावं लागतं—-

हर रोज हमें मिलना हर रोज बिछडना है.
मै रात की परछाई तू सबह का चेहरा है.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 11 मे, 2013

मेरा अपना तजुर्बा है, तुम्हे बतला रहा हु मै

डॉ.कुमार विश्वास.

गेल्या वर्षी लोकपाल विधेयकाच्या निमित्तानं दिल्लीत मोठं आंदोलन सुरु होतं. श्री अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल,किरण बेदी आणि अन्य मंडळींच्या आंदोलनाला लोकांनी प्रचंड अशा संखेनं पाठींबा दिला. एक प्रचंड उत्साह त्यावेळेस दिसला होता. अगदी स्वांतंत्र्याचा लढा आम्हाला प्रत्यक्ष पाहता आला नाही, पण तसंच वाटावं असं भारावून गेलेलं वातावरण होतं, असं अनेक लोक बोलत होते. माध्यमांची दिवसभर क्षणाक्षणाची रिपोर्टींग सुरु असायची. नेत्यांच्या भेटीगाठी स्टेटमेंट्स यांची ब्रेकींग न्युज चाललेली असायची. आणि या आंदोलनाच्या निमित्तानं एक चेहरा विविध वाहिन्यांवर झळकत असायचा. दुपारच्या वेळी मुख्य आंदोलनकर्ते जेव्हा आराम करत असायचे तेव्हा एक तरुण त्या माईकचा ताबा घ्यायचा आणि त्या गर्दीला सांभाळायचा ते मला आवडायचे ते नाव म्हणजे डॉ.कुमार विश्वास.

कुमार विश्वास या माणसाला मी कधी भेटलो नाही पण भेटण्याची संधी मिळाली तर नक्कीच भेटेन. काही माणसं आपल्याला उगाच आवडत असतात. आपल्याला त्यांच बोलणं आवडतं, त्यांचं नुसतं दिसणं आवडतं आणि आपण त्यांच्या प्रेमात पडतो. प्रेम कोणतंही असो, ते आंधळं असतं आपली फसगत होते तरीही आपल्याला अक्कल येत नाही. आपण पुन्हा तिच्या/त्याच्या आठवणीत गुंतून जातो. लोक काय म्हणतात त्याचा विचार करत नाही. कुमार विश्वास यांचे मी अनेक व्हिडियो आज दिवसभर पाहिले प्रत्येक कार्यक्रमात तो आपली आवडती कविता म्हणतो आणि रसिकांच्या काळजांचा ठाव घेतो. अतिशय गोड वाटतं त्याची कविता ऐकतांना. आपण कधी प्रेम केलं असेल, आपण प्रेमात पडला असाल, रडला असाल तर तुम्हाला कुमार विश्वास यांच्या आवाजातील ही गोड कविता नक्कीच आवडेल. असं वाटतं ( इथे ऐका )

कोयी दिवाना कहता है, कोयी पागल समजता है,
मगर धरती की बेचैनी को, पागल समजता है
मै तुझसे दूर कैसा हू, तू मूझसे दूर कैसी है
ये तेरा दिल समजता है, या मेरा दिल समजता है
के मोहबत एक एहसान की पावनसी कहानी है,
कभी कबिरा दिवाना था, कभी मीरा दिवानी है
यहा सब लोक कहते है, मेरी आखो मे आसू है
जो तु समजे तो मोती है, जो ना समझे तो पानी है
समंदर पीर का अन्दर है लेकीन रो नही सकता
ये आसू प्यार का मोती है, इसको खो नही सकता.
मेरी चाहत को अपणा तु बना लेना मगर सून ले
जो मेरा हो नही पाया वो तेरा हो नही सकता
भवर कोयी कुमदनी पर मचल बैठा तो हंगामा
हमारे दिल मे कोयी ख्वाब पल बैठा तो हंगामा
अभी तक डूब कर सुनते थे सब किस्सा मोहब्बत का
मै किस्से को हकिकत मे बदल बैठा तो हंगामा.

कुमार विश्वास यांच्या बद्दल मला फारशी माहिती नाही. तुनळीवर (कोणी लावला राव या शब्दाचा शोध) काही व्हिडियोंमधे हास्य कवी संमेलनात ते कविता म्हणतांना दिसतात. अभियंता आणि विद्यापीठात शिक्षक असल्याचे वाटते. विविध ठिकाणी त्यांचे स्टेज शो झालेले दिसतात. दिल्लीतल्या आंदोलनापूर्वीही त्यांचे आपले काही चाहते आहेत असेही दिसते. आपल्याकडून त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली तर वाचायला आवडेलच. एका व्हिडियोवरच्या दुव्यात ते असं म्हणतात की मला लोक विचारतात की तुम्ही आंदोलनात का सहभागी झालात तर ते म्हणतात जेव्हा माझी येणारी पिढी आणखी काही वर्षांनी विचारेल की माणसांना सामाजिक विषयावर जोडणारं एक आंदोलन झालं होतं, त्यात तुम्ही सहभागी होता का तर मी ताठ मानेनं म्हणेन की माझा सहभाग त्यात होता. अशा आशयाचं ते बोलतात. मला त्याची कविता आवडते, त्यांचं बोलणं आवडतं, एक भूमिका आवडते. हं आता काही कार्यक्रमात ते थोडा पांचटपणाही करतांना दिसतात. पण, एवढं तेवढं चालायचंच.

कुमार विश्वास यांची शैली अशी आहे की, दोन ओळी म्हणाच्या जरासा पॉज घ्यायचा, प्रेक्षकात काही हालचाल होत असेल तर त्यावर कमेंट्स करायच्या. बोलता बोलता उत्तरप्रदेश, राजस्थान, इथल्या काही वैशिष्ट्यांचा उल्लेख करायचा त्यावर विनोद करायचा. शिटी वाजवली तर त्यावर कमेंटस करायच्या. विद्यापीठातील अध्यापक कसे गंभीर असतात त्यावर बोलायचे, विद्यार्थी वस्तीगृहात पहिल्यांदा येतो तेव्हा खोबर्‍याच्या तेलाची बाटली वगैरे अमूक अमूक घेऊन येतो नंतर त्याच्याकडे कशा वेगवेगळ्या बाटल्या सापडतात त्यावर कमेंटस करत करत प्रेक्षकांना मनमुराद हसवायचे अशी ती शैली आहे आणि मधेच मग निवेदन करता हू, आपको इस कविताकी चार लायने पसंद आयेगी. आणि मग तरुणांना आवडेल अशा दोन ओळींची निवड करायची. अर्थात जालावर याच शैलीतल्या म्हणजे तो कोणत्याही ओळी म्हणतांना एकच अशी शैली निवडतो असे दिसते. विनोदाची पेरणी करायची आणि मग मग आता काही कवितेच्या ओळी म्हणणार आहे, आपल्याला त्या आवडणार आहेत. आणि जर आपल्याला त्या ओळी आवडल्या नाहीत तर मी शायरी सोडून देईन. (सर्वच ठीकाणी हाच फॉर्मुला)

मेरा अपना तजुर्बा है, तुम्हे बतला रहा हु मै
कोयी लब छु गया था तब, के अब तक गा रहा हु मै.

आणि एकदा प्रेक्षकांची दाद मिळाली की मग पुन्हा मग मै आपके सामने कुछ कविताये पेश करता हू लेकीन कविताए के बारे मे लोग कहते है की आप प्रेमकीही कविता क्यो सुनाते हो. कुछ सामाजिक देश के बारे मे क्यु नही लिखते. मग तो म्हणतो, प्रेम हजारो साल पहले था, अब भी है, और कल भी रहेगा. पाकिस्तान तेरसट साल पहले नहीथा, आज है…………आणि मग पॉज घ्यायचा. पब्लिक खळखळून दाद देते. आपण महाविद्यालयात शिकत असतांना जिच्यावर प्रेम करतो ती काही वर्षांनी भेटते तेव्हा ती तिच्या मुलाला म्हणते देखो बेटा मामा…. वगैरे.

बिछड के तुमसे प्यार मे कैसे जिया जाये बिना तडपे
जो मै खुद ही नही समजा वही समजा रहा हू मै.

किसी फ़त्तर मे मूरत है
कोयी फत्तर की मूरत है

लो हम ने देखली दुनिया, जो इतनी खूबसूरत है
जमाना अपनी समझे पर मुझे अपनी खबर ये है
तुझे मेरी जरुरत है मुझे तेरी जरुरत है.

कार्यक्रम सादर करतांना एक सोबती असतो मला वाटतं तो कवी असावा आणि ते ठरवून प्रेक्षकांची करमणूक करतात आणि ते इतकं सहजपणे होतं की ते लक्षात येत नाही. . मधे मधे बोलून त्याच्या मुद्द्याला पकडून विनोद करतात युपीचं शाळेतील इंग्रजी कसं आहे, प्राचार्य बनना चाहीहे मै ओ क्यु नही बनता. प्राध्यापक सतत गंभीरच का असतात वगैरे यावर विनोद मारुन पुन्हा निवेदन करता हू–

मेरे जीने मे मरने मे तुम्हारा नाम आयेगा
मे सांसे रोक लू फीर भी यही इल्जाम आयेगा.
हर एक धडकन मे जब तुम हो तो फीर अपराध क्या मेरा
अगर राधा पुकारेगी तो फीर घनशाम आयेगा.

आपल्याला कुमारविश्वास यांच्य कविता आवडतील म्हणून हा प्रपंच….!!!

उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.

2013-01-10-002

उगवतीचे रंग


दहा वाजेच्या सुमारास नाष्ट्याची आठवण झाली आणि मिसळपाव नेहमीप्रमाणे आडवी आली. यथेच्छ ताव मारला. पोटाचं काही होणार तर नाही, ना अशी पुसट शंका आम्ही पुसून टाकली. पुण्याला अगोदर पोहचलेल्या मित्राला प्रा.डॉ.सुधाकर जाधव, परतुर.जि.जालना यांनाही सोबत घेतले आणि सातारा रोड पकडायचा तर आमच्या ड्रायव्हरनं सोलापूरचा रस्ता पकडला होता. गुगल नकाशा सुरु करुन सुरु करुन चिपळूण रस्त्याला लागलो. उंब्रज सोडलं आणि कोकण सुरु झालं याची पुरेपुर खात्री पटत चालली. अरुण इंगवले हा चिपळूणचा कवी म्हणतो-
माझ्या तांबड्या मातीत, आंब्या फणसाच्या वास नमन, जाखडी, दशावतार गोम-संकासूर नाव.
येथे खळाखळत्या नद्या,टच्च फुगलेल्या खाड्या पडाव,गलबत मचवे,कुठे शेलाटश्या होड्या
असं कवितेतील कौतुक वास्तवात दिसायला लागलं. आंबे, पोफळी, साग, नारळ,

2013-01-12-044
चिपळूणचो रस्तो

अशा दाटीवाटीतून रस्ता चिपळूणला चालला होता. घाट ओलांडत एकदाचे चिपळूणला पोहचलो. चिपळूणला चौकाचौकात परशुरामाच्या भूमीत स्वागत आहे, अशा भाऊ दादांच्या आणि गल्ली बोळातल्या एका दिवसात नेता झालेल्यांचे होर्डींग्ज लक्ष वेधून घेत होते. संमेलन स्थळी पोहचलो तेव्हा सायंकाळचे साडेपाच झालेले होते. वातावरणात प्रचंड दमटपणा वाटत होता. मैदानावर (यशवंतराव चव्हाण नगरीत) धूळही अधिकची दिसत होती. मुख्य व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले, केंद्रीय कृषिमंत्री. मा.श्री. शरद पवार, उषा तांबे, सुनिल तटकरे कौतिकराव ठाले, दादा गोरे, कुंडलिक अतकरे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे विविध पदाधिकारी दिसत होते. अशा या भव्य व्यासपीठावर भव्य स्क्रीनही लावलेला होता. आणि यशवंतराव चव्हाण नगरी साहित्यप्रेमींनी तशी फूलूनच गेली होती. साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला पंधरा ते वीस हजार लोक असावेत, असे मला वाटते.

मा.सुनिल तटकरे यांचं स्वागताध्याक्षाचं भाषण चालू होतं. वादापलिकडे जाऊन साहित्यसंमेलनाचा आनंद घ्यावा, असे आग्रहानं नमुद करुन चुकभुल पदरात घ्यावी, असे म्हणून झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे म्हणाल्या की महामंडळाच्या वतीने चिपळूनच्या साहित्य संमेलनाचा आनंद वाचकांनी, साहित्यप्रेमींनी सामान्य नागरिकांनी याचा घ्यावा म्हणत. विश्व साहित्य संमेलन काही कारणाने घेऊ शकलो नाही, परंतु साहित्य महामंडळाचे विविध उपक्रम चालू आहेत, त्याची माहिती सांगितली. लोक

2013-01-11-007

यशवंतराव च्व्हाण नगरी

विनाकारण वाद करत असतात अगदी निमंत्रण पत्रिकेत राजकीय नेत्यांची नावं खूप दिसतात इथपासून ते संमेलन उधळून लावू या सर्व गोष्टींचा उहापोह त्यांनी प्रशासकीय पदाधिकारी आणि महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून केला.

अध्यक्षपदाची सूत्रं बहाल करतांना वसंत आबाजी डहाके म्हणाले, साहित्य माणसाला जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नव्हे. अध्यक्षपदाची सूत्र देणे हा एक भाग असेल परंतु सूत्र म्हणजे बांधिलकी आणि या सामाजिक बांधिलकीचे हस्तांतरण म्हणजे सूत्र बहाल करणे. आणि पुढे साहित्य, साहित्य संमेलने, भाषा, वाचक, अशी सहज मांडणी करत शब्द वापरणे हे जोखमीचे काम आहे त्याचा योग्य वापर केला पाहिजे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभा बद्दल बोलतांना दैनिकांतील पत्रकारांना विधानांचा आणि विषयांचा विपर्यास करण्याची एक वाईट सवय लागली आहे, त्यामुळे समाजात द्वेषाचं वातावरण निर्माण होते, सामाजिक ऐक्याला तडे जातात तेव्हा पत्रकारांनी समाजाला जोडण्याचे काम करावे, असे ते म्हणाले. अतिशय सहजपणे सर्वांना भावेल असे हे भाषण झालं. त्यानंतर ’रत्नप्रभा’ या स्मरणिकेचं प्रकाशन साहित्य संमेलनाचे उद्घाटक कृषिमंत्री मा.श्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

मा.श्री शरदपवार यांच्या उद्घाटनीय भाषणाला सुरुवात झाली. राजकारणी आणि साहित्यिक यांचा संबंधाच्या निमित्ताने लेखनात सर्व प्रकारचे लेखन असते तेव्हा साहित्य संमेलनाच्या ठिकाणी राजकीय व्यक्तिच्या उपस्थितीबाबत आक्षेप घेतला जातो तो योग्य नाही.

2013-01-11-014
भव्य व्यासपीठ

राजकीय लोक साहित्य संमेलनात दिसले तर वाद घातला जातो परंतु राजकारणात साहित्यिक आले तर आम्ही वाद घालत नाहीत असे म्हणून प्र.के अत्रे, ना.धो.महानोर, आणि इतर साहित्यिकांचा दाखला देत विधानसभा-विधानपरिषद गाजवलेल्या दाखला दिला. राजकारणी चूकत असतील तर त्यांना योग्य दिशा साहित्यिकांनी सुचवली पाहिजे. मुख्य व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याने वाद झाला म्हणे परंतु बाळासाहेब एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते, वादग्रस्त असले तरी त्यांची व्यंगचित्रे, पत्रकारिता, हे योगदान विसरता येणार नाही, असा उल्लेख झाल्याबरोबर प्रचंड टाळ्यांचा गजर झाला. साहित्य सर्वसमावेशक व्हावे, हे सांगून मराठी साहित्याचा मराठीच्या अधिव्याख्यात्यांना लाजवेल असे त्यांचे भाषण पुढे सरकत गेले. स्त्रियांचे सक्षमीकरण, स्त्रीवाद, आणि यापुढेही अधिकाधिक स्त्रिया संमेलनाच्या व्यासपीठावर दिसाव्यात असेही मत त्यांनी मांडले. मराठी साहित्य आणि त्याचे विषय इतर भाषेत पोहचले पाहिजेत. राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, असे लेखन पुढे येत नाही, त्याचा विचार व्हायला हवा. गाव तेथे ग्रंथालय होऊन वाचक समृद्ध व्हावा. त्याचबरोबर वास्तवाचे आकलन करुन लेखकांनी दमदारपणे तो विचार साहित्यातून मांडला पाहिजे अशी भूमिका मांडली. साहित्य लेखन अधिक समाजाभिमुख व्हावं असा विचार मांडून नवीन लेखक, नव्या लेखकांची पुस्तके, कादंबरी, ग्रामीण लेखक, संत साहित्य, आधुनिक साहित्य, भाषा,जागतिकीकरण त्याचा प्रभाव, प्रभावावरचे लेखन-लेखक,

2013-01-11-008

उद्घाटन समारंभ असा लांब बसून ऐकला

यांची नावे घेत त्यांनी कल्पना दुधाळ यांच्या दोन कविता वाचून आपल्या भाषणाचा समारोप केला. पाच वाजून बत्तीस मिनिटाला सुरु झालेले भाषण सहा वाजून एकविस मिनिटे चालले जवळ-जवळ तासभर. मराठी विषयाच्या प्राध्यापकाप्रमाणे त्यांनी मराठी विषयाचा रसिकांचा तासच घेतला. शेवटी शेवटी रसिक चुळबुळत असल्याचे जाणवले. साहेबांचे भाषण संपल्यावर राकॉचे कार्यकर्ते हळुहळु आपल्या खुर्ची सोडतांनाही दिसले.

एक अवांतर, आठवण होत आहे. कल्पना दुधाळ या एक कवयित्री आहे. ‘सिझर कर म्हणतेय माती’ या काव्यसंग्रहाने प्रकाशझोतात आलेल्या कल्पना दुधाळ या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीभडक या गावातील रहिवासी असून त्या स्वत: शेती करतात. शेतीची सर्व कामे करतात, म्हणजे शेतकरीच. पण, कविता अतिशय सुंदर आहेत. अशा या कवयित्री औरंगाबादला मसापच्या कार्यक्रमाला आपल्या कुटुंबासहित हजर होत्या. त्यांच्या कवितेवर भाष्य करायला काही समीक्षकांना बोलावलेले होते. समीक्षकांनी या काव्यसंग्रहातील कविता कशा सुमार दर्जाच्या आहेत, दखल घेण्याजोगी एकही कविता नाही, वगैरे मांडले होते आणि या कवयित्रीच्या डोळ्यातून सारखे पाणी वाहात होते . पुढे याच काव्यसंग्रहाने त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुरस्कार आणि अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत, काल कल्पना दुधाळ यांच्या दोन कविता शरद पवार साहित्य संमेलनाच्या व्यासपीठांवरून वाचून दाखवत आहे, हा प्रसंग कवयित्रीला आज किती आनंद देत असेल, हा विचार सारखा येत होता. व्यक्तिगत मलाही त्याचा आनंद वाटत होता.

2013-01-11-039
परिसंवादाची तयारी

८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले हे आमचे थेट एम.ए.मराठी प्रथम वर्गाचे शिक्षक. आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत म्हणून असे म्हणत नाही. सर, पुढे कुलगुरुही आमच्या विद्यापीठात झाले. युजीसीच्या ‘जागतिकिकरण आणि मराठी साहित्यावर त्याचे परिणाम’ या सिसर्च प्रोजेक्टच्या वेळी सर आणि डॉ.यशवंत मनोहर हे मला विषय तज्ञ होते, पुढे हा प्रोजेक्टही मला मिळालाही होता. मिपावर माझ्या काही मित्रांनी मला संशोधनासाठी एक प्रश्नावलीही भरुन दिली होती. असे आमचे गुरुजी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांना आनंद होणारच, नाही का…!

2013-01-11-038

व्यासपीठासमोरील रांगोळी

सरांचे अध्यक्षीय भाषण सुरु झाले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्याचा आणि भाषेचा सर्वोच्च सोहळा आहे. साहित्यासाठी दर वर्षी अतिशय निष्ठेने संमेलनाला पदरमोड करुन ह्जारो रसिक येतात. इथे झडणा-या चर्चांमधे सहभागी होतात, ही अचंबित करणारी घटना आहे. मराठी साहित्य आणि भाषेबद्दलचे प्रेम जागविणारी गोष्ट आहे. या व्यासपीठावरुन साहित्याबदल काही चिंतन व्हावे, मराठी भाषा आणि साहित्य यांना अस्वस्थ करणाया प्रशांची चर्चा व्हावी, जमल्यास त्यातून मार्ग निघावा, निदान त्या दिशेने काही वाटचाल व्हावी, अशी रसिक जनांची अपेक्षा असते. अशा वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन अवतरणारे हे संमेलन या वर्षी चिपळूण येथे लो. टिळक स्मारक मंदिर या ग्रंथालयाच्या वतीने होत आहे. मला तर येथील निसर्गसंपन्नतेने भारावून टाकलेले आहे. मी मराठवाड्यातून आलेलो आहे. माझ्या प्रदेशाचा यासाठी उल्लेख केला की, तेथे वर्षा दोन वर्षांनी दुष्काळ पडतो. पिण्याच्या पाण्याचेही प्रश्न निर्माण झालेले असतात. ज्याला पाणी पहावयास मिळत नाही, समृद्ध निसर्ग पहावयास मिळत नाही त्या माझ्यासारख्या माणसाला आपण स्वर्गात तर नाही ना ? असे वाटले तर नवल नाही.

2013-01-11-014
कवी संमेलन सर्व कवी मंडळी.

सरांनी आपलेल्या लिहिलेल्या भाषणावरुन नजर हटवली आणि व्यासपीठावरील नेते मंडळीकडे पाहून म्हणाले आमच्या मराठवाड्यात पाणी टंचाई आहे, लक्ष घालावे. पाणीच नसेल तर माणूस बोलण्यासाठी उभा कसा राहील, असे म्हणत दाद मिळवली. माझ्या अठ्ठेचाळीस पानाच्या भाषणावर तिनशे पानांची चर्चा व्हावी, असे म्हणत चिपळूनचे निसर्ग सौंदर्य, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर,कवी कुलगुरु तुकाराम, साहित्य आणि जीवन, म.फुले, म.विठ्ठल रामजी शिंदे, डॉ.आंबेडकर, करंदीकर, सूर्वे, यांच्या साहित्य-समाज जीवनाची चर्चा करत मराठी भाषेचे संवर्धन, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भाषा विकासाची साधनं आणि माध्यमं, वाचन संस्कृती, आणि काही प्रश्न उपस्थित करुन भाषणाचा समारोप केला.

सरांचे भाषण तितके दमदार झाले वाटले नाही, एकतर कारण पवार साहेबांनी घेतलेला वेळ, रसिकांची एकाच जाग्यावर बसण्याची क्यापिसिटी, आणि परस्परविरोधी अघळ-पघळ अशी विधानं यामुळे मांडणीत नेमकेपणा नव्हता असे वाटत होते. अध्यक्षीय भाषणाकडून काही अपेक्षा असतात त्या पूर्ण झाल्या नाहीत, असे जे म्हणल्या जात आहे, ते थोडं पटण्यासारखं वाटलं. पण,एवढं तेवढं चालायचंचं.

उद्घाटनीय कार्यक्रम संपला. हात पाय मोकळे करावेत म्हणून काही चहा-पाणी करुन यावं म्हणून बाहेर पडलो. लगेच निमंत्रितांचं कवीसंम्मेलन सुरु होणार होतं. भव्य मंडपातून बाहेर पडू लागलो आणि अचानक आपल्या कवयत्रि मिपाकर क्रांती सडेकरांची भेट झाली. निमंत्रितांमधे त्यांची कविता आहे, हे मला कार्यक्रमपत्रिकेवरुन कळलेच होते परंतु भेट होईल अशी गर्दीत खात्री नव्हती परंतू भेट झाली आणि मिपाकरांना मिपाकर भेटल्यावर जो आनंद होतो तो मलाही झाला.

2013-01-11-013

सन्मानचिन्ह स्वीकारतांना क्रांती सडेकर

चहा पाणी घेऊन आलो.उद्घाटनाच्या वेळी पब्लिकमधे लांब बसून कार्यक्रम बघावा आणि ऐकावा लागला होता. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम मला मागे बसून बघायचा लैच कंटाळा. सतत पुढे असलं पाहिजे हा आमचा बाणा. महाविद्यालयाचे ओळखपत्र घरी विसरलो त्यामुळे नोंदणी केली नाही. नियोजन न करता आले की हाल होतात, ते हाल आमचे होणारच होते. मग, पुढे तर बसायचे तेव्हा आमच्यापैकी दोघांना तुम्ही मागून या असे सांगून आमदार, खासदार, आणि विशेष अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेश दारात पोहचलो. साहेबांबरोबर आलेलो आहोत असे पोलिसांना अंदाजपंचे ठोकून कोणा नेत्याच्या पाठीमागे दमदार पावलं टाकत महत्त्वाच्या पाहुण्यांमधे अगदी व्यासपीठासमोरची जागा बळकावली. पण, जिथे बसलो तिथेही मला समाधान वाटेना. तेथून उठलो आणि पत्रकार कक्षाची जागा निवडली. पत्रकारांसाठी असलेलं बिसलरीतलं पाणी आम्हाला मिळालं. अधाशासारखं घटाघटा पाणी पिऊन टाकलं आणि एक बिसलरी सोबतही ठेवली. च्यायला, एवढं करेपर्यंत क्रांतीची सडेकरांची कविता वाचून झालेली होती. ल्यापटॉपवर [उर्ध्वपट] थेट वृत्तांत मिपावर टाकावं तर ल्यापटॉपनं मान टाकली. गाडीच्या डिक्कित असलेल्या ब्यागेत ल्यापटॉपला घाटातून बहुतेक भोवळ आली असावी. ल्यापटॉप चालूच होईना. कवींच्या कविता सुरु झालेल्याच होत्या.

2013-01-11-005
छा.शिवाजी महाराज यांची साकारलेली प्रतिकृती

इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षेतेखाली शेख साहेबांची गझल सुरु झालेली होती. शेख साहेब म्हणाले-
”तु मला भेटू नको, नाराज असल्यासारखी
तु अशी वागू नको, प्रेमात नसल्यासारखी”

मला अशी प्रेमाची कविता ऐकायला मिळाली की मी आठवणींनी मोहरुन जातो. माझा मी चालू वर्तमान काळातून भूतकाळाच्या आठवणींवर डहाळीसारखा झुलु लागतो.मला शेख साहेबांची गझल आवडली. गझल संपल्यावर कवींचे सन्मानचिन्ह देऊन इंद्रजित भालेराव यांच्या हस्त सत्कार केल्या जात होता. प्रत्येक कवीला असं कविता वाचून झाल्यावर अशा प्रकारे सन्मानित करण्यात येतं होतं. पर्सनली मला ते काही आवडलं नाही. त्यामुळे काव्यमैफिलिचा बेरंग होत होता. सूत्र संचलन करणारा तर नक्कीच वशिल्याचा तट्टू होता. अतिशय सुमार सूत्रसंचलन या काव्य मैफिलीचं सुरु होतं. संतोश शेरेची कविता ‘हम्म’ होती.

”मला एक मूलगी दिसते, गच्चीवर,स्टेशनवर, बागेत,
एक मुलगी दिसते, चालतांना, खातांना, कुत्र्याशी खेळतांना
……
मुलगी दिसते सदान कदा सेलवर (मोबाईलवर) ”

बबलु वडारच्या कवितेला मात्र चांगली दाद मिळाली. आपण संगणकावर वावरणा-यांना संगणकीय

2013-01-11-040शब्दांचे नवल वाटत नाही. तसे अनेकदा अशा कविता डोळ्याखालून गेलेल्या असल्यामुळे लोकांना भावलेली आणि या साहित्य संमेलनाचं एक नवं फाइंडिंग म्हणून या कवीचा उल्लेख केला गेला, तेव्हा लोकांच्या अभिरुचीत आणि आपल्या अभिरुचीत फरक आहे असे मला वाटले. कविता साधारणतः अशी होती-”आऊटडेटेड झालंय आयुष्य, आणि स्वप्नही डाऊनलोड होत नाही.
……………..
घर आतां शांत असते, मोबाईलला रेंज नसल्यासारखे
……………………..
फाटली मन साधणारा इंटरनेटवर धागा नाही.
…………………………….
ही पिढी भलतीच क्यूट कॊंटेक्ट लिष्ट मोठी आणि संवाद झालाय म्यूट”अशी कविता दाद मिळवून गेली आणि या कवीला वन्स मोअर ची मागणीही झाली आणि त्यांनी ती मोजक्या ओळी म्हणून पूर्णही केली. संजिवनी तळेगावकर आमच्या मराठवाड्यातल्या कवयत्रि. दोन काव्य संग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘काट्यानेच काटा काढता आला असता तर आयुष्यात चालता आले असते’ असा एक शेर म्हणून कविता गायला सुरुवात केली. ओ माय गॉड, कविता गायन हा प्रकार कधी जमला नाही तर ते काव्यवाचन कसं फसतं आणि ऐकणा-यांचे कसे हाल होतात, त्याचा हा उत्तम नमुना होता, असे मला वाटते. ही कविता ऐकतांना माझे थोडे हालच झाले. रसिकांनी कविता संपल्यावर दाद दिली. हल्ली दाद कशालाही मिळते, असे वाटून गेले. योगिराज माने आपल्या बाप माझ्या कवितेत म्हणतो-

2013-01-11-035
खुल्या गप्पा. अशोक नायगावरकर, रामदास फुटाणे

”किति पुरविले लेकरांचे लाड
सावलीचे झाड बाप माझा.
वरुन कठोर काळजात लोणी
माय-बाप दोनही माझा.
दुष्काळी प्रश्नाला कष्टाचे उत्तर
घामाचे अत्तर बाप माझा.
गरिबीची नाही केली ……….
[च्यायला, इथला शब्द मीच लिहून मलाच तो शब्द आता वाचता येईना]
श्रीमंत मनाचा बाप माझा.
भजनात दंग मुखी हरिनाम
जानकीचा राम बाप माझा.
जन्मभर पंढरीची केली वारी
भोळा वारकरी बाप माझा.
………………………..
ईश्वराची छाया बाप माझा.”

मला ही कविता आवडली होती. पण लिहिण्याचा धावपळीत काही शब्द गळाले तर काही गळाला लागले. एक एक ओळ कवींनी पुन्हा पुन्हा म्हणायला हवी. अनिल निगुडकराची ‘वृद्धाश्रम’ नावाची कविता होती. भोपाळमधून आलेले हे कवी महाराज होते. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन कवींच्या कविता निवडून निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले पाहिजे. असा विचार माझ्या मनात आला. ‘आज आई-वडीलांना भेटायला जायचे आहे’ अशी ‘ट ला ट’ परंपरेतील ही कविता होती. एक कविता तर अशी होती आता कवीचं नाव लिहायचं विसरलो. सर्व चिन्ह त्या कवितेत भरलेली होती. जसे-

”काळा पैसा. पूर्णविराम.
बलत्कार, स्वल्पविराम.
फरारी, प्रश्नचिन्ह”

अशी काही तरी कविता होती. वंदना केळेकर यांची ‘मायमराठी’ विलास कुवलेकर यांची ‘माय’ आणि नंतर इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या काही कविता वाचून दाखवल्या. इंद्रजित भालेराव ‘आणखी एक’ कवितेत म्हणतात दोन ओळी –

”काट्या कुट्याचा तुडवित रस्ता
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता”

2013-01-11-034

निमंत्रण पत्रिका (शिल्लक राहीलेल्या. काही बदलल्या होत्या)

आणि गावाकडे शेतीची काय अवस्था आहे, शेतक-याचं जीवन कसं आहे, त्यावर असलेलं ही कविता होती. ती कविता झाल्यानंतर रसिकांकडून ‘जलम’ कवितेचा आग्रह झाला. ‘जलम’ कवितेलाही मी कंटाळलेलो आहे. पण त्याऐवजी त्यांनी दुसरी कविता म्हटली.

”शीक बाबा शिक लढायला शिक
कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक”
……………………………………..
”घेतलेली कर्ज बुडवायला शिक”

अशी एक कविता त्यांनी गायली रसिकांची भरपूर आणि मनापासून दाद या कवितेला मिळालेली दिसली. आता रात्रीचे अकरा वाजत आलेले होते. चहा-पाण्याचा कार्यक्रम करुन आलो तर…मराठी गीत गायनाचा कार्यक्रम सुरु झालेला होता. अतिशय सुरेख असा कार्यक्रम. मंगला खाडिलकर यांचं सुंदर सुत्रसंचलन. सुत्रसंचलनासाठी अभ्यास असावा लागतो, हे शिकवणारं सूत्रसंचलन. रविंद्र साठे, मंदार आपटे, मृदुला-दाढे जोशी यांच्या बहारदार गीत गायनाने अप्रतिम आनंद दिला. एकोनाविसशे तीस पासूनच्या काही सुंदर कविता ज्याचं गाणं झालं आहे, ते ऐकायला मिळालं.

दुसरा दिवस…

2013-01-11-026
मराठी गीत गायन

दुसर्‍या दिवशी सकाळी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, प्रकाश देशपांडे यांनी खुल्या गप्पांमधून मजा आणली. ”जो पर्यंत अशोक नायगावकरांची कविता आहे तोपर्यंत आकाशात सूर्य तारे फिरत राहतील” असे म्हणत रसिकांच्या चेह-यावर हसु फुलवले. रामदास फुटाणे वीज भारनियमनाचे ओझे नुसते सामान्य माणसाला नाहीतर विजेच्या खांबानांही आहे, असे म्हणाले. खांब नुसते उभे आहे त्यांचेही एक दु:ख आहे. गळ्यात तारेचे ओझे वागवावे लागते. ”व्याकुळ पोल म्हणाला ती हल्ली कुठे दिसत नाही, लोंबकळत तार म्हणाली, हल्ली तिने नवं घर केलं आहे, इन्व्हर्टर आल्यापासून ती आता कोणाला भेटत नाही” असे म्हणत खुल्या गप्पांमधे रंग भरला.

राजकारण-समाज-आणि साहित्य यावरची रंगलेलेली ही जुगलबंदी खासच झाली. पहिल्यांदाच कार्यक्रम बघणाणा-यांना या गप्पा दिलखुलास हसवतात. ”कविता ही कशी आतून आली पाहिजे, ढेकरही आतून येतो म्हणजे ती कविता होत नाही” ”माणूस लग्न कशासाठी करतो तर एकमेकांना कामे सांगण्यासाठी, रस्त्यावर भेटलेल्या बाईला आपण काम सांगु का ?” असे म्हणत नेहमीप्रमाणे मजा आणली. ‘ हे काय चालले आहे’ शीर्षकाच्या कवितेतून स्त्रीया कशा क्रर असतात. स्वयंपाक घरात काम करतांना स्त्रीया भाज्या कापतांना किती क्रुरपणे वागतात त्याची ती मिश्किल कविता.

रामदास फुटाणे यांची ‘हिमोग्लोबीन’ आणि ‘दोन मिनिटे’ नावाची कविता अनेकांनी ऐकली असेल. हिमोग्लोबीनच्या ओळी.


दादा म्हणाला-
‘वर्गणी काढा’
भाई म्हणाला-
‘खंडणी काढा’
डॉक्टर म्हणाले-
‘कपडे काढा’
रिपोर्ट म्हणाला-
”हिमोग्लोबिन कुठे आहे ?”
हिमोग्लोबिन हरवल्याची तक्रार घेऊन
मी पोलिस स्टेशनवर गेलो.
तर तिथे एक महात्त्मा उभा
चरखा हरवल्याची तक्रार घेऊन
पोलिस पावती विचारत होते
चरखा खरेदी केल्याची
एक हवालदार जवळ आला
म्हणाला-
हिमोग्लोबिनचा तपास कसा लागेल ?
प्रथम रक्त होतं
हे सिद्ध करावं लागेल.

2013-01-11-017खुल्या गप्पानंतर ‘यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि आजचा महाराष्ट्र’ या परिसंवादात दीपक पवार, न.म.जोशीसर,शेषराव मोहिते, आणि उल्हासदादा पवार यांनी यशवंतरावांच्या विचारांनी सभामंडप भारावून टाकला. अध्यक्षीय समारोप निशिकांत जोशी यांनी केला. दुपारच्या सत्रात रामदास आठवले, उद्धव ठाकरे, हेही परिसंवादात होते. आम्ही सायंकाळी दोन दिवसांच्या उपस्थितीनंतर काही पुस्तकांची खरेदी केली. अ.भा.साहित्य संमेलनाच्य अध्यक्ष यांची अचानक समोरासमोर भेट झाल्यावर सरांचे अभिनंदन केले. एवढ्या गडबडीतही त्यांच्या चेहर्‍यावर ओळख आहे, असे भाव दिसले. ‘अरे वा , औरंगाबादहुन कोण कोण आलं’ असं विचारल्यामुळे आमचं येणं सार्थकी लागलं त्याच आनंदात आम्ही औरंगाबादला परत फिरलो.

« Newer Posts - Older Posts »

प्रवर्ग